जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात विदर्भाच्या कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, खासकरून यवतमाळमध्ये अस्वस्थ वाटणे, गरगरणे, दिसायला त्रास होणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. हे सगळे कापूस शेतकरी किंवा शेतमजूर होते आणि सगळ्यांना रानात कीटकनाशक फवारताना विषारी घटकांशी संपर्क आल्याने विषबाधा झाली होती. किमान ५० जण दगावले, हजाराहून अधिक आजारी पडले, आणि काही तर पुढचे कित्येक महिने आजारी होते. या संकटामुळे कापूस आणि सोयाबीनसाठी कीटकनाशकांचा होणारा अनिर्बंध आणि वारेमाप वापर उघडकीस आला. याचे विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत.
तीन लेखांच्या मालिकेतल्या या पहिल्या लेखात पारीने या काळात इथे नक्की काय झालं आणि महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या काय निदर्शनास आलं याचा मागोवा घेतला आहे.
याच मालिकेच्या पुढच्या लेखांमध्ये आपण इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं का वापरली जातात या व्यापक विषयाकडे बघणार आहोत. बीटी-कपास – बोंडअळीचा मुकाबला करणारं तंत्रज्ञान वापरून जनुकीय फेरबदल करण्यात आलेलं हे वाण या अळीच्या हल्ल्याला बळी पडल्याचं दिसून येतंय. उलट गुलाबी बोंडअळी जास्तच जोमाने परत आली आहे. आणि त्यामुळेच ज्याचं भय होतं तेच झालं – प्रचंड नुकसान.









