“बँकेची वसुली पथकं आता घरी यायची थांबलीयेत,” सरस्वती अंबरवार सांगतात. आम्ही यवतमाळमध्ये आहोत. १५ जून रोजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम जिथे भेट द्यायला येणार आहेत तिथून त्यांचं घर फार काही दूर नाही. विदर्भातल्या ज्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्यांची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली ती पहिली आत्महत्या होती सरस्वतींचे पती रामदास यांची, १९९८ मधली. तेव्हापासून इतकी वर्षं त्यांनी घेतलेली कर्जं फेडण्यासाठी कर्जदारांनी त्यांच्यामागे तगादा लावला आहे. त्यामुळे बँकेच्या वसुली पथकांनी येणं सोडून दिलंय हे जरा नवलाचंच होतं.
“किशोरभाऊंनी मला एक पत्र दिलं होतं, ते मी गेल्या वेळी ते आले ना तेव्हा दाखवलं,” त्या सांगतात. “त्यानंतर त्यांनी येणंच सोडून दिलं.” हे तर आणखीच नवल. किशोर तिवारी विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत आणि या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांमध्ये सगळ्यात आघाडीवरचे नेते आहेत. बँकेशी त्यांचं अजिबातच सख्य नाही कारण कृषी कर्जाच्या प्रश्नासंबंधी त्यांनी किती तरी वेळा बँकांना घेराव घालून फैलावर घेतलं आहे. मग, असं या पत्रात लिहिलं तरी काय होतं?
त्याचं थोडक्यात भाषांतर असं – “प्रिय वसुली अधिकारी, रामदास बऱ्याच वेळा स्वर्गातून येऊन माझ्यापुढे हजर झाला आहे. तो म्हणेः ‘माझ्यापाशी पैसा आहे, तुमच्या अधिकाऱ्यांना इकडे स्वर्गातच पाठवून द्या ना.’ आपला विश्वासू, किशोर तिवारी.” त्यानंतर, सरस्वती सांगतात, ते पथक परत कधीच त्यांच्या दारात आलं नाही.
तिवारींनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचा सूर जरा नरम होता. त्यामध्ये त्यांनी, “यवतमाळ किंवा वर्ध्याच्या अभागी विधवा शेतकऱ्यांना काही मिनिटं तरी भेटण्याची तसदी घ्या.”
राष्ट्रपतींच्या एका दिवसाच्या दौऱ्यामध्ये हे दोन जिल्हे आणि नागपूरचा समावेश आहे. त्यांच्या दौऱ्यामध्ये ते यवतमाळच्या आमोलकचंद कॉलेजमधल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आणि वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातही जाणार आहेत. आतापर्यंत तरी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कृषी संकटाशी संबंधित कोणत्या बैठकांचा उल्लेख नाही.
कपाशीच्या किंमतीचा मुद्दा
यवतमाळ, जिथे राष्ट्रपतींचा मुख्य कार्यक्रम आहे, विदर्भातला सर्वात बिकट स्थिती असणारा आणि कृषी संकटात होरपळून निघालेला भाग आहे. “या एका वर्षात विदर्भात ४२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत,” तिवारी आपलं लक्ष वेधतात. “कपाशीचा दर, देणी आणि कर्जाच्या मुद्द्यावर तातडीने पावलं उचलली नाहीत तर हे आपल्यासाठी सगळ्यात भयानक वर्ष ठरेल.” आणि हे गंभीर असेल. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षी शेतीवरील अरिष्टामुळे १,२९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याच वर्षी विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये आणखी १,३४८ आत्महत्या झाल्याची नोंद आहे मात्र या आत्महत्या शेतीवरील अरिष्टाशी असल्याचा सरकारने इन्कार केला आहे.
२००१ पासून विदर्भाच्या ज्या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून ६,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यातलाच एक म्हणजे यवतमाळ. नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून देशभरात कृषी संकटामुळे शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्यामुळे वैधव्य आलेल्या १ लाख स्त्रियांपैकी एक सरस्वती. यवतमाळमध्येच त्यांच्यासारख्या शेकडो जणी आहेत. त्यांच्या घरी आतापर्यंत अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येऊन गेल्या आहेत, शिव सेनेची सत्ता असताना महसूल मंत्री असलेले नारायण राणेदेखील. त्यांना मिळालेली १ लाखाची नुकसान भरपाई देणी देण्यात कधीची खर्चून गेली.
“माझी मुलगी मीनाक्षी आजारी आहे नं, तिच्या इलाजावर महिन्याला ३०,००० रुपये लागतात,” त्या सांगतात. (दुसरी एक मुलगी, २००४ साली वारली.) “सगळं भागवण्यासाठी आम्ही मागल्या काही वर्षात किती तरी एकर रान आणि जनावरं विकून टाकली. पण शेती जास्तच खर्चिक आणि कष्टाची होत चाललीये.” तरी देखील त्यांच्यापाशी जे काही पर्याय आहेत ते त्या करत राहतात, दिवस पालटतील ही आशा मनात असतेच.





