“माझ्याकडचा धागा संपलाय. होता तो पैसाही संपायला लागलाय. पण या टाळेबंदीमुळे मी शेठला [तयार] साड्या पण देऊ शकत नाहीये,” बुडवार गावचा चंदेरी कापडाचा विणकर असणारा सुरेश कोळी सांगतो.
कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीला आठवडाही झालेला नाही, आणि ३१ वर्षीय सुरेश यांच्याकडे जो काही धागा होता त्याच्या साड्या विणून झाल्या आहेत. तीन विणलेल्या साड्या प्राणपूर गावचे चंदेरी कापडाचे व्यापारी आनंदी लाल यांना द्यायच्या होत्या.
कोळींचं गाव उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात, बेतवा नदीवरच्या राजघाट धरणाजवळ आहे. नदीच्या पल्याडच्या तीरावर मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्यात चंदेरी हे नगर आहे. याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुतासाठी प्रसिद्ध. शेठचं गाव प्राणपूर तिथे जवळच आहे.
बुडवार आणि चंदेरीची वाट पोलिसांनी आडकाठ्या लावून बंद केलीये. ३२ किलोमीटरचा हा रस्ता पण सुरेश काही आनंदी लाल यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीयेत. “काय चाललंय तेच कळत नाहीये. जे दिल्लीहून घरी परततायत त्यांना पोलिस पकडून नेतायत,” सुरेश सांगतो. “आमच्या गावात ही बिमारी येईल तरी कशी? पण सरकारने आमचा जिल्हा पण बंद करून टाकलाय आणि आमचं सगळ्या जगण्याचीच उलथापालथ झालीये.”
सुरेशने आनंदी लाल यांच्याकडे तीन साड्यांचे ५,००० रुपये मागितले होते. “त्यांनी फक्त ५०० रुपये पाठवलेत, बाजारपेठा सुरू होत नाहीत तोपर्यंत पूर्ण पैसे देता येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे,” तो सांगतो.
टाळेबंदीच्या आधी शेठ सुरेशला कच्चा माल – सुत, रेशमाच्या लडी आणि जर – आणि साड्या, ओढण्या, स्टोल, काही मऊसूत अभ्र्यासारखे प्रकार किंवा नुसतं कापड विणण्यासाठी काही कमिशन द्यायचे. दर ठरलेला असायचा आणि आणि पैसे माल देताना आणि नेहमीच रोकड स्वरुपात केलं जायचं.









