तसं पाहिलं तर ते फक्त तिथून पुढे चालले होते – हजारांच्या संख्येत. रोज ते येत होते, पायी, सायकलींवर, ट्रकवरून, बसमधून, खरं तर त्यांना मिळेल त्या वाहनातून. थकलेले, भागलेले, घरी पोचण्यासाठी उतावीळ झालेले. सगळ्या वयाचे पुरुष आणि बाया आणि अनेक लहानगी देखील.
हैद्राबाद आणि त्या पल्याडहून येणारे लोक होते, मुंबई आणि गुजरातेतून, किंवा विदर्भाच्या पलिकडे पश्चिम महाराष्ट्रातून निघाले होते बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालला.
टाळेबंदी जाहीर झाल्यावर देशभरातल्या लाखो करोडोंची आयुष्यं अस्तव्यस्त झाली, उपजीविका ठप्प झाल्या आणि मग त्यांनी एक निर्णय घेतलाः गावाकडे, आपल्या कुटुंबांकडे, जिवलगांकडे परत जायचं. मग प्रवास कितीही खडतर असला तरी तेच बरंय.
आणि यातले अनेक जण नागपूर पार करून जातायत. नागपूर हे देशाच्या बरोबर केंद्रस्थानी असलेलं महत्त्वाचं शहर आणि एरवी सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं रेल्वे स्थानक. आठवड्यामागून आठवडे जात राहिले आणि लोंढे येतच राहिले. मे महिना उलटत चालला तेव्हा कुठे राज्य आणि केंद्र शासनाने स्थलांतरित कामगारांना बस आणि रेल्वेने पोचवायची व्यवस्था केली. पण ज्यांना या वाहनांमध्ये जागा मिळाली नाही ते मात्र दूरवरच्या आपापल्या गावी कसेही करून जातच राहिले.
















