“तुम्ही हे माझं नवं खातं इथे काढणार,” भयानक चिंताक्रांत झालेला धीरज रेहुवामन्सूर खेळीमेळीत वागणाऱ्या बँक व्यवस्थापकाला विचारतो, “पण मी देशाच्या इतर भागातून ते वापरू शकणार का?”
बघ, हसत हसत संजय अष्टूरकर सांगतात, “मी तुला एक एटीएम कार्ड देणार आणि ते तू तुझ्या राज्यात, गावात आणि जिथे कुठे एटीएम असेल, तिथे वापरू शकतोस.”
“मला काय उपयोग त्याचा?” जास्तच चिंतेत पडलेला धीरज विचारतो. “हे एटीएम कार्ड कसं वापरायचं हे मला अजिबात माहित नाहीये. आणि मी पडलो अंगूठा छाप, त्याच्यावर ते चालणार का मग?”
आता मात्र चिंता करायची पाळी बँक व्यवस्थापकाची होती. त्यांना पूर्ण कल्पना आहे की हा अगदी खराखुरा प्रश्न आहे. ते ज्या गटाशी बोलत होते त्यातले तिघे निरक्षर होते याची त्यांना कल्पना होती. एक दिवस असाही असेल, जेव्हा त्यांच्या अंगठ्याच्या ठशातच त्याच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असेल मात्र औरंगाबादच्या अडूळ गावात मात्र आता तरी अशी काहीही व्यवस्था उपलब्ध नाही. आणि जिथे कुठे ती आहे, तिथे बहुतेक वेळा ती वापरात नाही किंवा नादुरुस्त आहे. उत्तर प्रदेशातल्या धीरजच्या बहराइच गावात किंवा लखनौच्या ग्रामीण भागात, जिथे त्याचं कुटुंब राहतं तिथे एटीएम कार्ड वापरण्याची शक्यता नगण्य आहे, हेही त्यांना पुरेपूर ठाऊक आहे.
“मला जर चेकचं पुस्तक मिळालं तर अंगठा लावून ते मला वापरता येईल ना?” आता, खरं तर नाही. कारण त्याचं हे अगदी साधं – नो फ्रिल्स - खातं आहे आणि त्याच्यावर त्याला चेकपुस्तक मिळणार नाही.
धीरज अगदी रडकुंडीला आलाय. “अहो, मी तिकडे माझ्या घरच्यांना पैसे कसे पाठवणार सांगा. मी जरी इथे पैसे भरले आणि तिथे ते पैसे काढायला अगदी पार लखनौला गेले तरी ते पैसे काढणार कसे? मी जोपर्यंत त्यांना काही तरी रोख पैसे पाठवत नाहीत तोपर्यंत त्यांना उपाशी रहावं लागेल हो.”
महाराष्ट्राच्या अडूळमध्ये काम करणाऱ्या पाच राज्यातून आलेल्या ११ मजुरांपैकी एक धीरज. त्याच्याच आडनावाचे इतर चौघंदेखील उत्तर प्रदेशचेच आहेत. बाकीचे आसाम, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालचे. प्रत्येक जण दिवसाला ३५० रुपये कमवतो. या माफक कमाईत हे स्थलांतरित कामगार जेवणखाण, राहणं, कपडे, प्रवास असं सगळं भागवतात आणि वर काही पैसा आपल्या घरी पाठवत होते. त्यांच्यावर लक्ष्यभेदी हल्ला चढवणारी ८ नोव्हेंबरची नोटाबंदी घोषणा होईपर्यंत.
आम्ही भारतीय स्टेट बँकेची सहयोगी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या अडूळ शाखेत होतो. मदतीचा हात पुढे करणाऱ्या आपल्या काही कर्मचाऱ्यांसह बँकेचे व्यवस्थापक या स्थलांतरित कामगारांची खाती उघडण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होते. खरं तर कामकाजाची वेळ कधीची उलटून गेलीये पण तरीही या संकटात सापडलेल्या आणि अरक्षित मजुरांना सहाय्य करण्यासाठी बँकेचे कर्मचारी थांबून राहिले आहेत. या त्यांच्या नव्या ग्राहकांची पडताळणी प्रक्रिया ते आज पूर्ण करतील. उद्या त्यांची खाती सुरू होतील. आदल्या दिवशी उस्मानाबाद शहरात एका सहकारी बँकेत गरिबांना फारच वाईट वागणूक दिलेली आम्ही पाहिली होती. या सगळ्यांचं वागणं त्याच्या अगदी विरुद्ध होतं. आता बँकेत केवळ हा अकरा स्थलांतरितांचा संघ उपस्थित आहे. “कामाचा ताण न झेपल्याने बँकेचा सर्व्हर बंद पडला त्यामुळे आम्हाला आमची रोजची कामं बंद करावी लागली,” बँकेचे एक कर्मचारी सांगतात. आता नवा सर्व्हर आलाय आणि त्याची जुळणी सुरू आहे.



