“आम्हाला खरं तर तीन आवर्तनांची गरज होती, पण एकच आवर्तन सोडण्यात आलं. दीड म्हणा हवं तर, पण पहिलं पाणी खूपच लवकर आणि आम्हाला कसलीच कल्पना न देता सोडलं गेलं,” प्रशांत निमसे सांगतात. ते नांदुरगावचे शेतकरी आहेत. गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून त्यांच्या गावाला पाणी सोडलं जातं. निमसेंची द्राक्ष, अंजीर आणि इतर काही फळांची बाग आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या जागेत एक मंगल कार्यालय बांधलंय आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं जरा बरं चाललंय. हे गाव आता नाशिक शहराच्या हद्दीत सामावलं गेलं असल्यामुळे त्यांना भरपूर गिऱ्हाईक मिळतं. “माझं निभावलं, पण जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, त्यांची पार वाट लागली.”
“द्राक्ष पिकाचं नुकसान झालं की सगळ्याच दृष्टीने फटका बसतो,” वासुदेव खाटे या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं होतं. “दुष्काळात पाणी मिळत नाही त्याचा पिकाला फटका बसतो. अगदी द्राक्षांचं पीक हातात पडलं तरी त्याच्या दर्जात फरक पडतो. एक लक्षात घ्या, एकरामागे दर वर्षी किमान १०० दिवसांची मजुरी निघते. ४०,००० एकरावरचं द्राक्ष पीक जर धोक्यात असेल तर मजुरांचे पण हाल होणार, आणि एकूण ३० लाख दिवसांची कामं निघणार नाहीत. इथे बाहेरगावहून मजूर येतात, मराठवाड्यातून, अगदी लातूर, बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबादहून.” म्हणजे इथे झालेल्या नुकसानाची झळ मराठवाड्यातल्या हजारो कुटुंबांना पोचते.
आता पाऊस राज्यभर बरसू लागलाय. पण अनेक शेतकरी आणि मजुरांना माहित आहे की केवळ पाऊस पडल्याने ही समस्या सुटणार नाहीये. “काही तरी दिलासा मिळेल,” छायाचित्रकार-पुरोहित अकोलकर म्हणतात, “पण दूरगामी असं जे संकट वाढत चाललंय ते काही यामुळे सरणार नाहीये.”
पी. बी. मिसाळ, अधीक्षक अभियंता, सिंचन विभाग, नाशिक यांचं मात्र या समस्येबाबत वेगळंच मत आहे. “महाराष्ट्रात खरं तर कोणत्याच नद्या बारमाही नाहीत,” मिसाळ सांगतात. “गेल्या २० वर्षांत भूजलाच्या साठ्यात प्रचंड घट झाली आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रचंड उपसा होतोय. नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखावर पोचलीये, वर येऊन जाऊन असणारे ३ लाख लोक पकडा. जमिनीच्या वापराचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललंय. शहराच्या भोवती जी हिरवीगार माळरानं होती तिथे आता सगळीकडे बांधकाम झालीयेत,” पाऊस लहरी झालाय हे ते मान्य करतात मात्र कोणतीच आकडेवारी पाऊसमान “सर्वत्र समान कमी झालंय” असं दाखवत नसल्याचं ते सांगतात. प्रा. माधव गाडगीळ यांच्यासारख्या पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मात्र महाराष्ट्रात बारमाही नद्या होत्या. मात्र या नद्यांचं रुपांतर आता “मोठ्या प्रमाणावर हंगामी नद्यांमध्ये झालं आहे.”
या सगळ्यातून आपण शेवटी महाराष्ट्राच्या महा जल संकटामध्ये मानवाचा काय हात आहे याकडेच येऊन पोचतो. त्र्यंबकेश्वरातली पाण्याची समस्या आणि साताऱ्यातील जुन्या महाबळेश्वरमधल्या कृष्णेच्या उगमाची स्थिती सारखीच असल्याचं दिसतं. (तिथेही मे महिन्यात मी माझ्या सहकाऱ्यांसोबत नदीच्या उगमापासून तिच्या पात्राचा वेध घेतला होता, पहाः उगम नद्यांचे, उद्योगखोरी राज्यकर्त्यांची)
“एक लक्षात घ्या, नाशिक एक मोठं औद्योगिक क्षेत्र बनलंय. आणि इथल्या पाणी वापराच्या सगळ्या पद्धती बदलून गेल्या आहेत,” अकोलकर म्हणतात. “प्रत्येक भागात, प्रत्येक वस्तीत पाण्याचा प्रचंड मोठा असा अनियंत्रित बाजार तयार झाला आहे. अगदी पुरेपूर पाऊस झाला तरी काहीही फरक पडत नाही. पर्यटनाचा परिणाम हा की शहराचा कानाकोपरा काँक्रीटचा झालाय. त्यामुळे पाण्याला वाहण्यासाठी सोडा नुसता श्वास घेण्यासाठीही जागा उरलेली नाही.”