देबाशीष मोंडल निर्विकार चेहऱ्याने त्यांच्या घरच्या पडक्या भिंतींकडे पाहत होता. ३५ वर्षांपूर्वी ज्या घरात त्याचा जन्म झाला तिथे आता फक्त फुटक्या विटा, सिमेंट आणि पडलेलं छप्पर राहिलं होतं.
११ नोव्हेंबर रोजी तो ज्या वस्तीत राहायचा ती उत्तर कोलकात्यातल्या तल्ला पुलाखालची ६० घरांची वस्ती जमीनदोस्त झाली. सकाळी १०.३० च्या सुमारास महानगरपालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पोलिसांचा ताफा घेऊन आले. त्यांनी पाडापाडीचं काम करण्यासाठी सोबत मजूरही आणले होते. दोन दिवसांनी उरलं सुरलं बांधकाम पाडण्यासाठी त्यांनी बुलडोझर मागवले. ही वस्ती नामशेष करण्यासाठी त्यांना एक आठवडा लागला. दोन अर्धवट पाडलेली घरं आजही तिथे उभी आहेत, आणि बिगारी कामगार अजूनही (डिसेंबर) राडारोडा काढून टाकण्याचं आणि जमीन सपाट करण्याचं काम करतायत.
तल्ला पूल बीटी रस्त्याच्या नजऱुल पल्ली गल्लीमध्ये आहे. इथल्या रहिवाशांच्या मते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभारलेली त्यांची वस्ती सत्तर वर्षांहून जास्त जुनी आहे.
“वीज पडावी असं झालं आम्हाला!” महिन्याला ९००० रुपयांवर ॲम्ब्युलन्स चालक म्हणून काम करणारा देबाशीष सांगतो. त्याच्या वडलांचा जन्म झाला त्या खोपटाच्या जागी पक्कं घर बांधण्यासाठी त्याने तिथल्याच एका सावकाराकडून आणि काही मित्रांकडून १.५ लाख उसने घेतले होते. सुंदरबनच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातल्या संदेशखाली तालुक्याच्या दाउदपूर गावाहून त्याचे आजी-आजोबा कामाच्या शोधात कोलकत्याला आले त्याला आता किती तरी दशकं लोटली आहेत.
देबाशीषने बांधलेलं घर आज जमीनदोस्त झालं आहे. जास्त व्याजाने घेतलेलं कर्ज मात्र आहे तसं आहे.
या सगळ्या संकटाची सुरुवात झाली २४ सप्टेंबरला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वस्तीच्या लोकांना तोंडी सांगितलं होतं की पुलाची दुरुस्ती सुरू होणार आहे. थोडं फार लागणारं सामान घेऊन त्यांनी जावं आणि काम झालं की परत यावं. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी या साठ कुटुंबांना जवळच्याच दोन निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आलं होतं. एक होती रेल्वेच्या जमिनीवर तर दुसरी सरकारच्या सिंचन विभागाच्या जमिनीवर.










