गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर २०१८ ला ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर दहा महिने उलटले तरीही या नोटाबंदीचं भूत दीपक बडवणेंच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच बडवणेंना त्यांच्या अडीच एकर रानातून ३१ क्विंटल कपाशीचं पीक झालं होतं. त्याचे चांगले पैसे येतील अशी त्यांना आशा होती. “व्यापाऱ्याने ट्रक मागवला आणि माझ्या घरनं कापूस उचलला,” ते सांगतात. आणि अगदी तेव्हाच नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या रोकड टंचाईच्या झळा शेतीला बसू लागल्या होत्या. दीपक यांच्या कापसाचे पैसेच त्यांना मिळू शकले नाहीत. ‘व्यापारी आता सांगायलाय की तो दिवाळीपर्यंत [२०१७ च्या ऑक्टोबरच्या मध्यावर] पैसे चुकवेल,’ ते सांगतात.
व्यापारी बडवणेंना १,७८,४८३ रुपये देणं लागतो. या रकमेचा मार्चमध्ये मिळालेला धनादेश तीनदा न वटता परत गेला. “असं झालेला मी काही एकटा नाही,” औरंगाबाद शहराच्या थोडं बाहेर असणाऱ्या कारजगावमध्ये झाडाखाली बसलेले ३१ वर्षाचे दीपक माहिती देतात. माझ्या गावातल्या इतर काही जणांनाही अशाच रीतीने फसविलं गेलंय.
बडवणेंचं एकत्र कुटुंब आहे. त्यांना दोन मुलं. १३०० लोकसंख्येच्या त्यांच्या गावातल्या इतर काही जणही धनादेश वटले नाहीत, चेक बाउन्स झाले म्हणून अद्याप त्यांच्या मालाचे पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बडवणेंनी त्यातल्या काही जणांना बोलावून घेतलंय्. एप्रिलमध्ये, नोटाबंदीनंतर तब्बल सहा महिन्यांनी दीपकचे बंधू जितेंद्र यांचा ३४ क्विंटल कापूस २ लाखाला विकला गेला. पण हा धनादेशही वटला नाही. “माझ्या हातात पैसा येत नसेल तर मला याचा काय उपयोग आहे?” ३८ वर्षाचे जितेंद्र विचारतात. “खरिपाच्या पेरण्यांकरिता मला बी बियाणं, खतं घ्यायला रोख पैसे लागणार की नाही?”



