"ते हत्तीवर बसून आमच्या घरावर चाल करून आले, तर काय, आम्ही आमच्या मालकीच्या सगळ्या वस्तू आणि आमची पोरंबाळं तलावात टाकू, एक रिंगण बनवू अन् त्यांना आमच्यावर गोळ्या झाडायला सांगू. पण, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही," रूप रानी म्हणतात. कदाचित लवकरच त्या रामपुराच्या इतर रहिवाशांप्रमाणे त्यांना आपलं घरदार गमवावं लागणार आहे.
त्यांचं गाव हे पन्ना वाघ प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील अशा ४९ गावांपैकी आहे. इतले लोक सांगतात की वाघांची वाढती संख्या लक्षात घेता प्रकल्पाचं गाभा क्षेत्र वाढवण्याची गरज आहे असं वन विभागातर्फे त्यांना सांगण्यात आलं आहे. गाभा क्षेत्रात किंवा कोअर एरियामध्ये मानवी वस्तीला परवानगी नाही, आणि वाघांच्या महत्त्वाच्या वसतिस्थानांभोवती असलेल्या बफर क्षेत्रात वाघांना संचाराची मोकळीक मिळते शिवाय माणसं आणि वन्यजीवांना एकत्र नांदायची संधी मिळते. ऑगस्ट २०१२ मध्ये रामपुराचा पन्ना प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात समावेश झाला.
पण मागील चार वर्षांत गाभा क्षेत्र वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि रूप रानी आणि त्यांच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचं भविष्य मात्र अनिश्चित आहे. तेव्हापासूनच ते आपली जमीन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, शिवाय त्यांची पाच एकर जमीन दुसऱ्या जागी हलवून त्यासोबत रु. १० लाख मिळावे - २००८ मध्ये केंद्र शासनाने प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून ही रक्कम ठरवून दिली आहे - म्हणून वन विभागासोबत वाटाघाटी करत आहेत.




