“एवढ्यान संतापलेली नदी मी माज्या जन्मात नाय पायली,” ५५ वर्षांच्या सकुबाई वाघ सांगतात. त्या दिवशी, ४ ऑगस्टला, सकाळी १० वाजताच्या दरम्यान, त्या आणि त्यांचा २० वर्षांचा मुलगा मनोज घरातच होते. “बायर लयच पाऊस व्हता,” त्या आठवून सांगतात. “यकदमच पान्याची मोट्टी लाट आत आली. मानंपरत पान्यात व्हतो बराच वेल, एकमेकांचा हात धरून. थोड्या वेलान, सगलं वाहून गेलं, राबून कमावलेलं, सांभाललेलं, सगलंच.”
हादरवून सोडणाऱ्या अंदाजे २० मिनिटांनंतर, सकुबाई आणि मनोज पाण्यात हात-पाय मारत थोड्या उंच ठिकाणी येऊन पोहचले, तिथून त्यांना पुरामुळे झालेला विध्वंस दिसत होता. त्या सकाळी, महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गातेस खुर्द गावात वैतरणा नदीच्या पाण्यानं, सुकुबाई आणि इतर २४ जणांच्या झोपड्या जमीनदोस्त केल्या. संध्याकाळी पाणी हळुहळु ओसरू लागलं.
“बघा, माझा संसार,” नदीकाठी कोसळून पडलेलं त्यांचं झोपडं दाखवत सकुबाई म्हणाल्या. चिखलाने माखलेल्या जमिनीवर तुटलेल्या खापऱ्या एकावर एक रचून ठेवल्यात, छप्पर आणि भिंतीचा बांबूचा सांगडा आणि फाटून पडलेली ताडपत्री आहे. बरेच दिवस चिखलात पडलेला तांदूळ, कांदा आणि बटाट्याचा कुजकट वास हवेत भरून राहिला आहे. “वास सहन नाय व्हत, लय मलमलून आजारीसारखं वाटतं,” सकुबाई सांगतात.











