जून २००५ मध्ये ओरिसा सरकारने राज्यातल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या करारावर सह्या केल्या. दक्षिण कोरियाच्या स्टील निर्मिती करणाऱ्या पॉस्को या कंपनीसोबत झालेल्या १२ अब्ज डॉलरच्या (सुमारे ६५,८५६ कोटी रुपये) या कराराअंतर्गत खनिजांचे भरपूर साठे असणाऱ्या ओरिसातल्या पारादीपजवळ एक प्रकल्प उभारला जाणार होता. तिथली शेती आणि मच्छिमारी करणारी आठ गावं प्रकल्पासाठी उठवली जाणार होती. एकूण ४,००४ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातली २,९५८ एकर जमीन वनजमीन होती. स्टील कारखान्यासोबत एक खाजगी बंदर, वीज प्रकल्प आणि एक नगरही वसवण्यात येणार होतं.
आठ वर्षं होत आली, पण या प्रकल्पावरून आजही अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष सुरूच आहे आणि गावात लोकांमध्येही फूट पडली आहे.
या संघर्षाचं, विरोधाचं केंद्र म्हणजे धिनकिया. या गावाने अहिंसक मार्गाने कुठेही आपला निग्रह न सोडता संघर्ष सुरूच ठेवला आहे. पैसा मिळवून देणारे आपले पानमळे, भातशेती, सामुदायिक वनं, गोठे या सगळ्यावर या उद्योगासाठी पाणी सोडायला त्यांनी नकार दिला आहे.
गावकरी आपल्या गावात टाचा घट्ट रोवून उभे आहेत, त्यांनी गावाला कुंपण घातलंय, या प्रकल्पाने विविध कायद्यांचं उल्लंघन केलंय त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत आणि त्यांचं भविष्य त्यांना स्वतःला ठरवू द्यावं यासाठी याचनाही केल्या आहेत.
राज्य सरकारने मात्र निर्दयीपणे बळाचा वापर करून पोलिसी कारवायांमध्ये, खास करून इतक्यातच झालेल्या एका कारवाईत शेजारच्या गावांमधले पानमळे उद्ध्वस्त करून जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी शेकडो गावकऱ्यांवर २०० हून अधिक फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात देशद्रोह आणि अश्लीलतेचा समावेश आहे. ज्याचा उद्देश या गावकऱ्यांना कैदेत टाकणे आणि विरोध संपवणे असा होता हे स्पष्ट आहे.
पण धिनकियाच्या गावकऱ्यांचं – खास करून इथल्या बायांचं - म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा लढा सोडलेला नाही. त्यात प्राण गेले तरी बेहत्तर.







