लाखो लोकांचं पाणी आणि वीज तोडून त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यायला भाग पाडणे, पोलिस आणि राखीव सुरक्षा दलांचं कडं उभारून त्यांना ना-संपर्क क्षेत्रात कोंडून टाकून अतिशय घाणीत राहायला भाग पाडणे, पत्रकारांना आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणं अशक्यप्राय करणे, ज्यांचे स्वतःचे तब्बल २०० आप्त गारठून मरण पावलेत, त्यांनाच कडेलोटाकडे ढकलणे. जगात कुठेही अशी कृत्यं क्रूर मानली जातील आणि मानवी हक्क आणि प्रतिष्ठेवरचा घाला समजली जातील.
पण आपल्याला आणि आपल्या सरकारला तसंच सत्ताधारी उच्चभ्रूंना यापेक्षा फार जास्त दमनकारी समस्यांनी ग्रासलेलं आहे. उदाहरणार्थ, रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासारख्या जागतिक दहशतवाद्यांनी या पृथ्वीतलावरच्या सर्वात महान देशाची बदनामी आणि मानहानी करण्यासाठी आखलेल्या कटकारस्थानांची पाळंमुळं कशी खोदून काढायची.
काल्पनिक जगतात हे वेड्यासारखं विनोदी आहे. प्रत्यक्षात, फक्त वेड्यासारखं.
आता हे सगळं धक्कादायक असलं तरी आश्चर्यकारक मात्र नाही. ज्यांनी कुणी “मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स” या घोषणेवर विश्वास ठेवला होता त्यांनासुद्धा आतापर्यंत कळून चुकलं असेल की प्रत्यक्षात मात्र आपल्या वाट्याला सर्वशक्तीमान बलदंड सरकार आणि सर्वाधिक भयानक शासन आलं आहे. काळजीचं कारण म्हणजे एरवी सुस्पष्ट बोलणारे, ज्यातले काही सत्तेचा पक्ष घेऊन अशा कायद्यांचं समर्थन करण्यात अग्रणी होते तेही मूग गिळून गप्प आहेत. तुम्हाला असं वाटू शकतं की लोकशाहीचं रोज होत असलेलं हनन त्यांनाही पटणार नाही.
सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याच्या वाटेतला खराखुरा अडथळा काय आहे हे केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अगदी प्रत्येकाला माहितीये.








