आपल्या घराकडे जाणारी गल्ली चढून जाणं ७२ वर्षांच्या आदिलक्ष्मींना गेल्या वर्षी पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघड होऊ लागलंय. दक्षिण बंगळुरूच्या सुद्दागुंटे पाल्य भागातल्या भवानी नगर वस्तीतलं त्यांचं घर म्हणजे एक खोली, जिथे त्या त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबासोबत राहतात.
आदिलक्ष्मी आणि त्यांचे पती, कुन्नय्या राम, वय ८३, हे दोघं ३० वर्षांपूर्वी तमिळ नाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या त्यांच्या गावाहून कामाच्या शोधात बंगळुरूला आले. कुन्नय्यांना सुतार म्हणून नोकरी मिळाली आणि अधिलक्ष्मींनी त्यांची दोन मुलं आणि दोन मुलींचा संसार सांभाळला.
“मी म्हातारी आहे म्हणजे काय मला पोटापाण्याला काही लागत नाही?” त्या विचारतात. गेल्या सहा महिन्यात जेव्हा जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतींना रेशन – दर महिन्याला माणशी सात किलो तांदूळ मोफत, नाकारण्यात आलंय तेव्हा दर वेळी असंख्य वेळा त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. वरचे दीडशे रुपये देऊन त्यांना भातासोबत कमी दरात मीठ, साखर, पाम तेल मिळायचं तेदेखील थांबलं आहे.
या म्हाताऱ्या जोडप्याला रेशन का बरं नाकारण्यात आलंय? कारण दोन किलोमीटरवरच्या त्यांच्या रेशन दुकानात त्यांचे बोटाचे ठसे जुळत नाहीयेत. बोटांच्या ठशांची पडताळणी करण्याचं काम करणारी ही यंत्रं बंगळुरूतल्या रेशनच्या दुकानांवर बसवण्यात आली आहेत – शहरात अशी सुमारे १८०० अशी दुकानं आहेत.







