मला आजही तो दिवस आठवतो. आईच्या कुशीत पांघरुणात निजल्या निजल्या मी आईकडून गोष्ट ऐकत होतो – “आणि मग आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी सिद्धार्थ आपलं घर सोडून बाहेर पडला,” ती सांगत होती. रात्रभर पाऊस सुरू होता आणि आमच्या खोलीत धरणीच्या कुशीत शिरल्यासारखा मृद्गंध पसरला होता, मेणबत्तीची काजळी छतापर्यंत पोचत होती.
“आणि सिद्धार्थाला भूक लागली तर?” मी विचारलं. खरंच किती खुळा होतो ना मी? सिद्धार्थ तर देव होते.
आणि मग १८ वर्षांनंतर मी परत त्याच खोलीत आलो. पाऊस सुरू होता – खिडक्यांच्या तावदानावरून पागोळ्या गळत होत्या. माझ्या शेजारी पांघरुणात निजल्या निजल्या माझी आई बातम्या ऐकत होती. “२१ दिवसांची टाळेबंदी जाहीर झाली तेव्हापासून भारतातल्या मोठ्या शहरांमधून किमान ५ लाख स्थलांतरित कामगार चालत आपल्या गावी पोचले आहेत.”
प्रश्न आजही तोच आहेः त्यांना भूक लागली तर?



