चितेमपल्ली परमेश्वरीला किती तरी वेळा वाटतं, चक्क पळून जावं. “लेकरांना सोडून कसं जावं? त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?” ३० वर्षांची परमेश्वरी म्हणते.
परमेश्वरीच्या नवऱ्याने, चितेमपल्ली कमल चंद्र याने २०१० साली नोव्हेंबर महिन्यात वयाच्या अगदी विशीत आत्महत्या केली. “त्याने चिठ्ठी पण ठेवली नाही. कदाचित त्याला नीटसं लिहिता यायचं नाही म्हणून असेल,” हलकं हसत ती सांगते.
आणि मग शेषाद्री आणि अन्नपूर्णा या आपल्या दोघा मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. हे दोघंहा आता सरकारी शाळेत शिकतायत आणि घरून ३० किलोमीटरवर असलेल्या एका वसतिगृहात राहतात. “त्यांची फार आठवण येते,” असं म्हणताना तिला भरून येतं. पण स्वतःला सावरत ती म्हणते, “पण त्यांना वेळेवर जेवण मिळतंय. कळतंय मला.”
दर महिन्यात ती एकदा त्यांना भेटून येते. “माझ्याकडे पैसे असले तर मी त्यांना ५०० रुपये देते आणि नसले तर २०० [रुपये] देते,” ती सांगते.
परमेश्वरी माडिगा आहे. तेलंगणात हा समाज अनुसूचित जातीत येतो. ती चिलतमपल्ले गावात एका खोलीच्या घरात राहते. तिच्या घरचं छत दबलंय. घराच्या बाहेर पत्र्याची शेड आहे. चिलतमपल्ले विकाराबाद जिल्ह्यात येतं. हे घर सासरच्यांच्या नावावर आहे. लग्न झाल्यावर परमेश्वरी इथेच रहायला आल्या.










