'बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंद' सियादेही गावाच्या वेशीवर असा फलक लावण्यात आला होता. छत्तीसगड मधील धमतरी जिल्ह्याच्या नगरी तालुक्यातील सियादेही गावात भेट देण्यासाठी गेलो असता जवळ बसलेले काही लोक वेशीपाशी लावलेल्या आडकाठ्यांजवळ येऊन माझ्याशी बोलू लागले – अर्थात अंतर राखूनच.
"आम्ही गावकऱ्यांनी, सगळ्यांच्या सहमतीने वेशीवर केलेली बंदी ही आम्हा सर्वांना कोरोनापासून वाचवण्यासाठी केलेली आहे," असं शेजारच्या कांकेर जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयात व्याख्याता असणारे भरत ध्रुव म्हणाले. सियादेही हे ९०० लोकसंख्येचं, मुख्यतः गोंड आदिवासी असलेलं गाव असून ते छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून ८० किलोमीटरवर आहे.
"आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, त्यासाठी आम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे, तसंच आम्हाला सुद्धा इथून बाहेर जाऊन लॉकडाऊनचे नियम मोडायचे नाहीत. त्यासाठी आम्ही ही बंदी केली आहे." शेती आणि मजुरी करणारे राजेश कुमार नेताम सांगत होते.
"संपर्क टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही अडवत आहोत. जर कोणी आलं तर आम्ही त्यांना 'तुमच्या गावात निघून जा' अशी विनंती करतो," शेतमजुरी करणारे सज्जीराम मंडावी म्हणाले. "आमच्या गावातील काही तरुण कौशल विकास योजनेखाली महाराष्ट्रात गेले होते, पण ते होळीच्या आधीच गावात परत आलेत. तरीही, आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची माहिती घेतली आहे."
परतत असलेल्या इतर स्थलांतरित कामगारांचं काय? त्यांना तुम्ही आत घेणार का? "हो," पंचायत अधिकारी मनोज मेश्राम म्हणाले. "पण सरकारी नियमानुसार त्यांचं विलगीकरणं केले जाईल."






