डिसेंबर २०२० मध्ये सुरेंद्र कुमार यांनी आठवड्यातला एक दिवस चार तास स्वयंपाकासाठी वेळ दिला होता. तोही उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गाझीपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. हळूहळू चाराचे आठ तास झाले, आणि आता तर सुरेंद्र आंदोलनकर्त्यांसाठी आठवड्यातून जवळपास १२ तास स्वयंपाकाचं काम करतायत.
"मला बहुतेक रोजच इतका वेळ स्वयंपाक करावा लागेल असं दिसतंय," ५८ वर्षीय सुरेंद्र म्हणतात. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडच्या गाझीपूरच्या आंदोलनात सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती संख्या बघता ते म्हणतात.
सुरेंद्र एक हलवाई असून उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शौरो (उर्फ सोरम) गावात त्यांचं एक दुकान आहे. "आम्ही इथे [गावात] अन्न शिजवतो आणि ट्रॅक्टर व कारमधून सीमेवर पाठवतो," ते म्हणतात. गावकरी आठवड्यातून एकदा गाझीपूरला अन्न पाठवतात.
"पहिल्यांदा तिकडे उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडचे फार शेतकरी नव्हते. म्हणून मी दुकान सांभाळून आठवड्यातून काही तास [स्वयंपाकासाठी] वेळ काढू शकत होतो. पण दिवसागणिक काम वाढत चाललंय," सुरेंद्र म्हणतात.
शौरोहून साधारण ९५ किमी दूर असलेलं गाझीपूर २६ नोव्हेंबर, २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या तीन मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. जानेवारी अखेरीस भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांच्या भावपूर्ण आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिमी उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन स्थळी येऊ लागले आहेत.









