या गावाला मोठा इतिहास लाभलेला आहे. निम्मा नायडू या सतराव्या शतकातील राज्यकर्त्याच्या नावावरुन तेलंगणातल्या अदिलाबादमधल्या या गावास निर्मल हे नाव पडले. नायडू यास कला व खेळणी यांमध्ये प्रचंड रस होता. त्या काळी त्याने ८० कारागिरांना एकत्र आणून खेळण्यांचा हा उद्योग सुरू केला. पुढे जाऊन याच उद्योगाने निर्मलला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करुन दिले.
... आणि आज, अदिलाबादला जाणाऱ्या किंवा जवळच असलेल्या कुंटाला धबधब्यास भेट देणाऱ्या प्रत्येक वाटसरुचं हे आवर्जून थांबण्याचं ठिकाण झालं आहे. पण बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही की, शतकानुशतके जुनी लाकडी खेळणी बनविण्याची कला या गावात अजूनही जिवंत आहे. एक लाखांपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या केवळ ४० कुटुंबं या व्यवसायात आज शिल्लक राहिली आहेत.
वनस्पती आणि प्राण्यांच्या रुपातच खेळणी बनविणे, हे इथल्या कारागिरांचं वैशिष्ट्य. नैसर्गिक लाकूड वापरण्याबरोबरच, खेळणे तंतोतंत होण्यासाठी ते खेळण्याच्या आकाराचा व ठेवणीचा बारीक अभ्यास करतात. मग ते प्राणी असोत किंवा फळं.







