कोल्हापूर जिल्ह्यातल्या टाकवडे गावातले मारुती निर्मल शेतकरीही आहेत आणि ते बागकामही करतात. ते त्यांच्या आठ गुंठ्यात उसाची शेती करतात. ही जमीन त्यांच्या वडलांच्या, राजाराम यांच्या नावावर आहे.
मारुतींचे शेजारी देखील उसाची शेती करतात. त्यांच्या शेताला बांध नाही त्यामुळे मारुती सांगतात, “शेजारच्या रानातला ऊस उंच वाढला की भाराने वाकतो, आणि शेजारच्या पिकांवर त्याची सावली पडते. मी जर सोयाबीन किंवा भुईमूग लावायचा ठरवलंच तर शेजारच्या रानाला लागून असलेल्या काकरीत काही उगवत नाही. ऊनच लागत नाही. आधीच माझ्याकडे फक्त आठ गुंठा जमीन आहे. त्यात पीक वाया जाऊन कसं चालेल?”
त्यांची जमीन इतकी कमी आहे की ऊस लावून त्यांना फार काही फायदा होत नाही. लागवडीलाच १०,००० रुपये खर्च होतो. २०१५ साली मारूतींनी शेतात बोअर मारली. त्याला ७०,००० रुपये खर्च आला. पावसाच्या आणि बोअरच्या पाण्यावर अंदाजे आठ टन ऊस निघतो. उसाला प्रति टन २,७०० ते ३,००० रुपये भाव मिळतो. “सगळं नीट पार पडलं तर मला उसाचं १८ महिन्यांनी १४,००० रुपयांचं उत्पन्न मिळतं,” मारुती सांगतात.



