गुणधर नाईक घरी आहे का, मी शेजारच्या घरी भांडी घासत बसलेल्या एका बाईला विचारलं.
“तुम्ही कुठनं आलात, आणि इथे तुमचं काय काम?” तिने विचारणा केली.
मी खरियारचा एक पत्रकार आहे आणि मी पूर्वी गुणधरबद्दल लिहिलं होतं, मी सांगितलं. त्याचं कसं काय चालू आहे हे पहायला मी आलोय.
त्या बाईने बारकाईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, “तुम्ही ठाकूरजी तर नाही?” हो, मी म्हणालो. इतक्या वर्षांनंतरही तिने मला ओळखलं याचा मनाला आनंद वाटला.
१९९६-९७ दरम्यान मी ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्याच्या बांगोमुंडा तालुक्याच्या बारलाबहेली गावात कित्येकदा आलो होतो. आणि आता वीस वर्षांनी मी परत एकदा तिथे उभा होतो.
१९९६ मध्ये पश्चिम ओडिशामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता – बलांगीर, नौपाडा आणि इतर जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. प्रचंड उपासमार आणि भूकबळी झाले होते. परिणामी मोठ्या संख्येने लोक गावं सोडून गेले होते. अनेक जण आंध्र प्रदेशातल्या वीटभट्ट्यांवर कामाला गेले. खेदाची बाब म्हणजे, या प्रदेशासाठी यात वावगं काहीच नव्हतं – दर २-३ वर्षांनी दुष्काळाचा फेरा यायचा आणि हे असं सगळं घडायचं.
बालमती नाईक, उर्फ घामेला, ही एक ३२ वर्षांची आदिवासी बाई. शेतमजुरी करणारी ही विधवा बारलाबहेलीच्या ३०० रहिवाशांपैकी एक. दोन वर्षांआधी तिच्या पतीचं निधन झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी घामेलाला तिचा छोटा जमिनीचा तुकडा सोडून द्यावा लागला होता. ती रोजंदारीवर काम करत असे, पण दुष्काळामुळे तिच्या गावात कुठे काही कामच नव्हतं. ती आणि तिचा सहा वर्षांचा छोकरा, गुणधर भुकेकंगाल झाले होते. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी घामेलाच्या मृत्यूआधीच तिच्या परिस्थितीबद्दल तालुका विकास अधिकाऱ्यांना कळवलं होतं. पण त्यांनी काहीही केलं नाही.
६ सप्टेंबर १९९६ रोजी, अंदाजे १५ दिवस उपाशी राहिल्यानंतर घामेला गेली. त्यानंतर अनेक तासांनी तिच्या निष्प्राण देहाशेजारी बसून रडत, ओरडत असलेला तिचा सहा वर्षांचा मुलगा गावकऱ्यांच्या नजरेस पडला.
या भूकबळीवरचे आणि त्यानंतरच्या परिणामांवरचे माझे लेख ऑक्टोबर १९९६ मध्ये दैनिक भास्करने प्रसिद्ध केले होते. काही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांनी त्या गावाला भेट दिली आणि हा मुद्दा उचलून धरला. मानवी हक्क आयोगाचे सदस्यही भेट द्यायला आले आणि त्यांनी हा भूकबळीच असल्यावर शिक्कामोर्तब केलं. राजकीय नेते, तालुका विकास अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गावाच्या वाऱ्या केल्या. अगदी पंतप्रधान एच डी देवेगौडादेखील त्यांच्या दुष्काळी भागांच्या दौऱ्याचा भाग म्हणून इकडे भेट देणार होते, मात्र ते काही आले नाहीत.






