महामारीच्या आधीचं नॉर्मल काय होतं, तर सामाजिक-धार्मिक विचारांचे आणि बाजारपेठेच्या अर्थकारणाचे कट्टरवादी कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात असलेल्या माध्यमांच्या शेजेवर सुखाने नांदत होते. आणि अनेक सारे नेते, या दोन्ही मांडवाखाली अगदी सुखेनैव रमले होते.
दोन हजार अब्ज रुपये इतकं मूल्य असणाऱ्या माध्यमांना (ज्यात मनोरंजन उद्योगाचाही समावेश होतो) कित्येक दशकं स्थलांतरित कामगारांशी काहीही देणं घेणं नव्हतं. २५ मार्चनंतर मात्र या कामगारांच्या सगळ्या हालचालींनी ही माध्यमं जणू अचंबित झाली, भारावून गेली. एकाही ‘राष्ट्रीय’ वर्तमानपत्राकडे श्रमिकांचं जग टिपणारा पूर्णवेळ वार्ताहर नव्हता, किंवा शेतीच्या वार्ता देणारा वार्ताहरही नाहीच (असलाच तर ‘कृषी प्रतिनिधी’ असं त्याचं ‘हास्यास्पद’ पद, आणि त्याचं काम काय तर कृषी मंत्रालय आणि आता जास्तकरून कृषी उद्योगांचं वार्तांकन करणे). मात्र या दोन्ही क्षेत्रासाठी पूर्ण वेळ माणसंच नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर देशातली ७५ टक्के जनता, बातमी देण्याइतकी महत्त्वाची नाही.
२५ मार्चनंतरचे अनेक आठवडे, एरवी एखाद्या स्थलांतरित पुरुषाने किंवा बाईने त्यांच्या पेकाटात लाथ हाणली तरी त्याची ओळख त्यांना पटली नसती अशा वृत्तनिवेदक आणि संपादकांनी या विषयातले आपणच ज्ञानी असल्याचा चांगलाच आव आणला. काही जणांनी मात्र खेदाने मान्य केलं की माध्यमातल्या आपण या सगळ्यांच्या कहाण्या जास्त चांगल्या पद्धतीने सांगितल्या पाहिजेत. आणि या अशा काळात माध्यमांच्या कॉर्पोरेट मालकांनी १००० हून जास्त पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला – आणि स्थलांतरितांचे प्रश्न जरा जास्त खोलात जाऊन सातत्याने मांडले जाण्याच्या आशाही मावळल्या. आता या सगळ्यांना कामावरून कमी करण्याचे निर्णय खरं तर महामारीच्या आधीच घेतले गेले होते. यातही ज्यांनी अशा प्रकारे सर्वात जास्त कूटकारस्थानं केली त्या माध्यम कंपन्या गंगाजळी ओतप्रोत भरलीये अशा सगळ्यात जास्त नफा कमवणाऱ्या कंपन्या होत्या.
आता हे असं नॉर्मल कोणत्याही शब्दात मांडलं तरी झोंबतंच ना.
तर, आता एक असा माणूस आहे जो मनात येईल तेव्हा टीव्हीवर स्वतःचा रिॲलिटी शो चालवतोय. आणि सगळ्या वाहिन्या हातात हात घालून बहुतेकदा अगदी मोक्याच्या वेळेत केलेली ही आत्मस्तुती प्रसारित करतायत. मंत्रीमंडळ, शासन, संसद, न्यायालयं, विधानसभा, विरोधी पक्ष कवडीमोल झालेत. तंत्रज्ञानातले माहिर म्हणवणाऱ्या आपल्याला संसदेच्या एकाही सत्राचं एका दिवसाचं कामकाजही पार पाडता आलेलं नाही. आभासी, ऑनलाइन, दूरदर्शी माध्यमातून संसद काही चालत नाही – टाळेबंदी लागून १४० दिवस झाले तरीही. आपल्यासारख्या तंत्र-प्रज्ञेचा अंशही नसणाऱ्या अनेक देशांनी मात्र हे केलं, तेही अगदी सहज.
आता युरोपातल्या काही देशांनी गेली चार दशकं कल्याणकारी राज्याची जी अंगं मोडीत काढली होती त्यात नाखुशीने आणि थोडाफार का होईना श्वास फुंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतात मात्र आपल्या बाजारबाहुल्या डॉक्टरांचा विचार आजही मध्ययुगातल्या रक्तशोषणाचाच आहे. चक्रव्यूहात फसलेल्यांचं रक्त जळवा आनंदाने पितायत. गरिबांचं पुरेसं रक्त अजून शोषलं नाहीये ना. परजीवींनी तर आपला स्वभाव धर्म तर पाळायलाच हवा ना.
मग, पुरोगामी चळवळींनी काय करायचं? त्यांनी जुनं नॉर्मल कधीही स्वीकारलं नाही. मात्र त्याही पूर्वीचं असं काही आहे, ज्याकडे परत जाण्याची – न्याय, समता आणि प्रतिष्ठा असणारं जीवन यासाठीचे, आणि सोबत या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी लढे देण्याची आज गरज आहे.
‘समावेशक विकास,’ हे मेलेलं थडगं आपल्याला उकरून काढायचं नाहीये. आपली विचारचौकट न्यायाची आहे, आणि अंतिम ध्येय विषमता संपवण्याचं आहे. आणि याची प्रक्रिया – मार्ग अनेक आहेत, काही मळलेले तर काही नवे आणि काही सोडून दिलेले. पण या प्रक्रियेचा आपण सगळ्यांनी ध्यास घेणं गरजेचं आहे.