तत्ता लक्ष्मी आणि पोतदा लक्ष्मी पुरत्या भांबावून गेल्या आहेत. सरकारने टी लक्ष्मींना द्यायचे पैसे पी लक्ष्मींच्या खात्यात जमा केले आहेत – आणि पोतदा लक्ष्मींचे पैसे आंध्र प्रदेशच्या मुणगपाक मंडलमधल्या स्टेट बँकेच्या खात्यात जमा झाले आहेत.
तर, टी लक्ष्मींना अजूनही तब्बल १६,००० रुपये मिळायचे आहेत आणि पी लक्ष्मींना ९,०००. दोघी जणी दलित आहेत, भूमीहीन, आणि दोघीही मनरेगावर काम करतात – टी लक्ष्मी मुणगपाक गावात आणि पी. लक्ष्मी त्याच तालुक्याच्या गणपर्थी गावात.
२०१६-१७ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर ९५ दिवस काम केलं. त्यांना त्यांचा रोजगार मिळालेला नाही (आणि क्षेत्र सहाय्यकांनी पूर्ण ९५ दिवसांसाठीचा हिशेब काढलेला नाही) कारण एप्रिल २०१५ पासून सर्व मजुरांनी त्यांच्या मनरेगा जॉब कार्डाला आधार कार्ड जोडायलाच पाहिजेत असा सरकारचा आग्रह आहे.
“मुणगपाक गावातल्या संगणक चालकाने १८ आकड्याचा जॉब कार्ड क्रमांक आणि १२ आकड्याचा आधार कार्ड क्रमांक चुकीचा टाइप केल्यामुळे मला जे पैसे मिळायला पाहिजे होते [तिला येणं असलेल्या रकमेच्या जवळ जवळ निम्मे] गणपार्थी गावाच्या पी. लक्ष्मीच्या खात्यात जमा झाले,” त्या सांगतात.







