सगळ्यांनी मेहनत करून रान वापराजोगं केलंय. आता ते चांगलं सुपीक दिसायला लागलंय. “ही विहीर पाहिली?” घरच्यांनी आपल्याच मेहनतीने खोदलेली भली मोठी विहीर दाखवत त्या विचारतात. “जरा गाळ काढला, डागडुजी केली तर किती तरी जास्त पाणी साठेल नं.” पण त्यासाठी किमान १५,००० रुपये पाहिजेत. रानाला कुंपण करायचं तर लाखभर लागतील ते वेगळेच. त्यांच्या रानात उताराला शेततळं करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी लागणारा पैसा वेगळाच. बँकेतून कर्जाची बातच सोडा. मोडकळीला आलेल्या घराची दुरुस्ती करायची तर २५,००० रुपये गाठीशी पाहिजेत. “पिकं हातची गेली, दीड लाखांचं कर्ज झालं म्हणून माझ्या नवऱ्यानं जीव दिला,” त्या सांगतात. त्यातलं काही कर्ज त्यांनी फेडलंय आणि सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मिळालेले १ लाख रुपये आता जवळपास खर्चून गेले आहेत. तरी ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते त्यांचा तगादा संपलेला नाही. “आमचं बरं चाललं होतं. पण सलग किती तरी वर्षं शेतीच पिकली नाही आणि मग मोठा घाटा झाला.”
गेल्या अनेक दशकांतल्या सगळ्यात मोठ्या कृषी संकटाचा घाला इतर लाखो लोकांप्रमाणे या कुटुंबावरही पडला. शेतीचा खर्च वाढलाय, मालाला भाव मिळेनासा झालाय आणि सरकारने अंग काढून घेतलंय. “गावात सगळ्यांची हीच गत आहे,” त्या सांगतात. गेल्या वर्षीही पिकं वाया गेली. त्यांना जबरी तोटा सहन करावा लागला. भास्करने बीटी कपाशीवर विश्वास ठेवला. “सगळा मिळून दोन क्विंटल कापूस झाला,” त्या सांगतात.
सरकारने या नुकसानीत अजून भर टाकली. गेलं वर्षं संपता संपता सरकारने त्यांची “रिलीफ पॅकेज” च्या “लाभार्थी” म्हणून गणना केली. त्या अंतर्गत त्यांना नको असलेली एक महागडी “आधा जर्सी” गाय विकत घ्यायला लागली. भरपूर अनुदान असलं तरी त्यांना त्यांचा साडेपाच हजारांचा हिस्सा द्यावाच लागला. “आम्ही सगळे मिळून खात नाही तेवढं त्या भुताच्या पोटाला लागतं,” त्या आम्हाला सांगतात. (द हिंदू, २३ नोव्हेंबर २००६) आणि “दूध पण टिचभर.”
उफराटा भाडेकरार
तेव्हापासून, “मी दोनदा ती देऊन टाकली, पण ते फिरून तिला माझ्यापाशीच आणून देतात,” हताश होऊन त्या सांगतात. ज्यांना त्या ही गाय देऊ पाहतात, त्यांचं म्हणणं काय तर “आम्हाला काही तिला खाऊ घालणं परवडत नाही.” त्यामुळे आता “मी माझ्या शेजाऱ्याला त्या गाईला चारायला महिना पन्नास रुपये देते.” उफराटाच भाडेकरार. सौदा काय तर गाय जेव्हा कधी दूध द्यायला सुरुवात करेल कमलाबाईंना निम्मं दूध मिळेल. हे सगळं भविष्यात होईल अशी आशा उरात ठेवायची. सध्या तरी जी गाय कमलाबाईंना आधार ठरणार होती तिच्या राखणीसाठी त्यांना पदरचा पैसा खर्च करावा लागत आहे.
पण त्या मोडून पडल्या नाहीयेत. ज्या दिवशी त्यांना काम मिळत नाही त्या दिवशी त्या आपल्या दूरवरच्या रानात पायी जातात. आज त्यांची उत्साही नातवंडं त्यांच्यासोबत गंमती करत दुडदुडत असतात. त्यांच्या आयुष्याचा आणि भविष्याचा विचारच त्यांना बळ देतो. नेहमीप्रमाणे, त्यांची मान ताठ आहे. पण नातवंडांकडे पाहिलं की डोळ्याला धारा लागतात. कमलाबाईंनी निश्चय केलाय, आत्महत्या गेलेल्यांचा नाही, तर मागे राहिलेल्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांच्यासाठीच त्या कंबर कसून सज्ज आहेत.
पूर्वप्रसिद्धीः द हिंदू २१ मे २००७
https://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/Suicides-are-about-the-living-not-the-dead/article14766288.ece
अनुवादः मेधा काळे