काहीच पर्याय नाहीत असं लक्षात आल्यावर विजय कोरेती आणि त्याच्या मित्रांनी अखेर पायीच घरी जाण्याचा निर्णय घेतला.
एप्रिलचे दोन आठवडे उलटले होते. कोविड-१९ च्या महामारीमुळे भारतात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परक्या भूमीत आपल्या खोपटांमध्ये अजून किती काळ असंच अडकून राहू शकू असा त्यांना प्रश्न पडला होता.
“दोन वेळा माझ्या मित्रांनी इथून निघण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना अडवलं आणि माघारी पाठवलं,” कोरेती सांगतात. “पण एक एक करत ते सगळे निघून गेले, पायीच, घराच्या दिशेने.”
या सगळ्या मित्रांकडे मिळून जीपीएसची सुविधा असणारा एकही स्मार्टफोन नव्हता, त्यांनी एक कच्चा मार्ग ठरवलाः
तेलंगणाच्या कोमारम भीम जिल्ह्यातल्या सिरपूर-कागझनगरमध्ये ते कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिलमध्ये कामाला होते. हे गाव हैद्राबाद-नागपूर रेल्वे मार्गावर आहे.
तिथून महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं झाशीनगर हे त्यांचं गाव रेल्वेरुळांच्या कडेकडेने चालत गेलं तर ७००-८०० किलोमीटरवर होतं. भयंकर कष्टप्रद, पण प्रयत्न करायला हरकत नाही. सोबत, ते जर रेल्वेलाइन शेजारून चालत निघाले तर पोलिसांनी अडवण्याची शक्यताही कमी होती.
तर, देशभरातल्या लाखो-करोडो लोकांप्रमाणेच कोरेती आणि झाशीगरचेच इतर काही जण निघाले. एक एकरभर जमीन असणारे कोरेती गोंड आदिवासी आहेत. गावी आपापल्या कुटुंबाकडे पोचण्यासाठी त्यांचा कागझनगर ते झाशीनगर असा १३-१४ दिवसांचा खडतर प्रवास सुरू झाला.
खरं तर हे अंतर बस किंवा रेल्वेने अर्ध्यात दिवसात पार होण्याइतकं आहे. पण त्यांना मात्र पायी जावं लागलं.












