पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ स्टेशनवर उतरून तुम्ही ग्रँड ट्रक रोडवर या. सगळीकडे नुसती धूळच धूळ. दगड भरून चाललेल्या मोठाल्या ट्रक्समुळे रस्त्यावर जागाच नाही, धूळ आणि धुराचे ढग मागे सोडत ट्रक चाललेत. धूळ सोडून तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही आणि नाका-तोंडात आणि डोळ्यात धुळीचे कण जाऊ नयेत म्हणून तुम्हाला चेहरा कपड्याने झाकून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
बिरभूमच्या मल्लारपूर दगडखाणींच्या पट्ट्यात असणाऱ्या गरिया या आदिवासी गावाकडे आम्ही निघालोय. तिथल्या आदिवासी मुलांना त्यांच्या मायबोलीत प्राथमिक शिक्षण देणारी उथनऊ नावाची एक सामाजिक संस्था तिथे काम करते. दगडखाणींमध्ये काम करणाऱ्या आणि खडी फोडणाऱ्या कामगारांशी मला बोलायचं होतं.
गरियामध्ये माझी गाठ घासीराम हेम्ब्रोम यांच्याशी पडली. ते भारत जकात माझी मंडुआ या संथाल गावाच्या आणि त्या भागातल्या मुखियांची संघटना आहे. तेच माझे सांगाती असणार होते. लिपिडी गावाकडे निघालो असता वाटेत आम्हाला एक म्हातारी भेटली, एकटीच चालत होती. काळ्या वर्णाची, कुरळे पांढुरके केस, अनवाणी, तोंडाचं बोळकं, पांढऱ्या साडीवर जुनी लाल रंगाची शाल पांघरलेली. ती एकटी राहते, झारखंडच्या सीमेवर. आपली वंशपरंपरागत आलेली जमीन खाणमालकाला काही रुपयांसाठी विकून तिची मुलं आणि नवरा तिला सोडून निघून गेलेत. आता तिचं घरही जाणार आहे. दगडांची ही खुली खाण आता जास्त मोठी होत चाललीये. आणि तिची झोपडी गिळंकृत करेल तो दिवस दूर नाही. चरितार्थासाठी ती दगड फोडायचं काम करते, ट्रकमधून दगड खाली उतरवायचे आणि नंतर ते फोडायचे.








