सरुताई (मूळ नाव बदलण्यात आले आहे) घराबाहेरच्या आंब्याखाली नुसतीच बसली होती. कुशीत बाळ कण्हत होतं. तिच्या चेहऱ्यावर कसली तरी उदासी दिसत होती. “पाळीचे दिवस जवळ आलेत, कुर्माघरात जावून ऱ्हावं लागते ना मग,” ती म्हणते. पाळीला माडिया भाषेत 'कुर्मा' म्हणतात. सरूताईला तिचे पाळीचे ४-५ दिवस याच कुर्माघरात एकटीने काढावे लागतात.
येणाऱ्या पाळीच्या विचारानेच सरूताईची बेचैनी वाढते. “कुर्मात जीव कोंडल्यासारखा होतो. एवढ्या लहान मुलांपासनं दूर झोपवत नाय,” कडेवरच्या चुळबुळ करणाऱ्या ९ महिन्याच्या बाळाला जोजावत ती म्हणते. तिचा जीव जास्त तुटतो तिच्या साडेतीन वर्षांच्या कोमलसाठी (मूळ नाव बदलण्यात आलं आहे). कोमल घराजवळच्याच बालवाडीत शिकते. “कधी तरी मुलीला पन पाळी येईलच, तिच्यासाठी लय जीव घाबरतो.” ३० वर्षांच्या सरूताईला मुलीच्या पाळीची चिंता नाही पण कुर्माघरातील त्या वेदना मुलीच्याही वाट्याला आल्या तर? या विचारानेच तिला धस्स व्हायला होतं. कारण शेवटी त्यांच्या माडिया आदिवासी समाजात ही परंपरेने चालत आलेली प्रथा प्रत्येक स्त्रीला पाळावी लागते.
सरूताईच्या गावात चार कुर्माघरं आहेत. घरं कसली, कुडाच्या झोपड्याच त्या. ती वापरत असलेली झोपडी घरापासून १०० मीटरवरच आहे. गावातल्या २७ महिला आणि किशोरवयीन मुली त्यांच्या पाळीदरम्यान या झोपड्यांमध्ये राहतात. “आईला, आज्जीला पाळीत कुर्मातच बघून मोठी झालीये. आता मी जाते. माझ्या कोमलला नको हे सगळं,” ती म्हणते.
माडिया समाजात मासिक पाळीच्या दिवसात महिलांना अशुद्ध आणि अस्पृश्य मानलं जातं आणि त्यांना घराबाहेर वेगळं राहण्यास सांगितलं जातं. “आता १३ वर्षाची असताना पासनं जाते, कुर्मात,” सरूताई तिच्या माहेरमधली परिस्थिती सांगू लागते. लग्न करून ५० किलोमीटर दूर, गडचिरोलीच्या पूर्व भागातल्या तिच्या सासरी येऊनही काहीच बदललं नाही.
तेव्हापासूनच्या दिवसांची आकडेमोड केली तर १८ वर्षांत सरूने हजारेक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षं - कुर्मात काढली आहेत. पाळीचे साधारण ५ दिवस एवढ्याशा झोपडीत, जिथे ना शौचालय, ना स्वच्छ पाणी, ना वीज, ना पंखा, ना कुठलं अंथरूण ना पांघरुण. तो प्रत्येक दिवस, प्रत्येक तास कसा काढला असेल हे तिच्या आवाजातल्या वेदनांतून जाणवत रहातं. “आत सगळा काळोख. भीती वाटते. अंधार गिळून टाकील असं वाटतं. तेव्हा खूप वाटतं, पळत घराकडं जावं आन् मुलांना घट्ट छातीशी लावावं. पन हिंमतच होत नाय.”


















