“अभ्यासाला बसल्यावर, पानी पडत राहतं वह्यांवर, पुस्तकांवर. लिहिलेलं विस्कटतं, शाई पसरते,” आठ वर्षांचा विशाल चव्हाण सांगू लागला. बांबूच्या बांधणीचं छत, विरघळलेली, जगोजागी फाटलेल्या ताडपत्रीच्या भिंती कशाबशा मोठ्या धोंड्याच्या वजनाने टिकल्या आहेत. त्या ताडपत्रीच्या घरात अभ्यासा करताना होणारी तारांबळ तो सांगू लागतो.
विशाल आळेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत असून, तो बेलदार या भटक्या जमातीचा आहे.
“पावसाळ्यात झोपडीत राहणं कठीण जातं... पाणी पडत राहतं, इतून-तितून,” विशाल सांगतो. शिरूर तालुक्यातल्या आळेगाव पागा गावाबाहेरच्या भटक्या-विमुक्तांच्या वस्तीतल्या त्यांच्या घरात विशाल आणि त्याची ९ वर्षांची मोठी बहीण वैशाली जिथून पाणी टपकत नसेल असा कोपरा मग अभ्यासासाठी शोधतात.
शाळा शिकणाऱ्या विशाल आणि वैशालीचं त्यांच्या आज्जीना खास कौतुक वाटतं. “आख्ख्या खानदानात कोनी शाळा नाय पायली,” ८० वर्षांच्या शांताबाईं म्हणतात, “ही मुलंच पहिलीच, पुस्तक वाचत्यात.”
पण कौतुकासह मनाला बोचणारी खंतही शांताबाई बोलून दाखवतात. “आता पोरांना नीट अभ्यासाला पक्कं घर नाय, लाईट नाय,” आपल्या ताडपत्रीच्या घराबद्दल त्या म्हणतात.












