सागाच्या एका मजबूत फांदीला वेटोळं घालून नागोबा बसलेला होता. रत्ती टोला गावातल्या लोकांनी त्याला हुसकण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो काही हलेना.
पाच तास प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर गावकऱ्यांनी मुंद्रिका यादव यांना बोलावलं. ते जवळच्याच वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात वनरक्षक म्हणून काम करायचे. त्यांनी आजवर वाघ, बिबट्या, गेंडा आणि सापासारख्या २०० पशुप्राण्यांची सुटका केली आहे.
मुंद्रिका आले आणि त्यांनी आधी तो नागोबा झाडावरून खाली यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. “मी त्याच्या तोंडात बांबूचं टोक घातलं आणि रस्सी आवळली. मग त्याला पिशवीत टाकलं आणि जंगलात सोडून दिलं,” ४२ वर्षीय मुंद्रिका सांगतात. “२०-२५ मिनिटाचं काम होतं.”






