गेल्या वर्षी, मे २०२३ मध्ये पार्वतीताई मनरेगाच्या कामावर गेली होती. पाच दिवस. त्यानंतर इतक्यात नाहीच.
तेव्हा आपल्या गौर मधुकर शाहपूर गावातल्या रस्त्याच्या सपाटीकरणाचं काम तिने केलं होतं. सरकार वर्षातून किमान १०० दिवस रोजगाराची हमी देईल असं सांगणाऱ्या मनरेगाने तशी हमी आणि तितकं काम पार्वतीताईला कधीही दिलं नाहीये. ४५ वर्षांची रोजंदारीवर काम करणारी पार्वती (आडनाव वापरत नाही) जाटव या अनुसूचित जातीची आहे. “अर्धपोटी राहून आम्ही जगतोय कसं तरी,” ती सांगते.
पार्वतीच्या पदरी शासनाकडून आणखी एकदा निराशा आली. प्रधान मंत्री आवास योजनेसाठी तिने आणि तिच्या पतीने केलेला अर्ज २०२० साली फेटाळण्यात आला. वाट पाहूनही काहीच झालं नाही. मग तिचे पती छोटे लाल आणि तिने दोन खोल्यांच्या घराचं बांधकाम करण्यासाठी नातेवाइकांकडून ९०,००० रुपये कर्ज घेतलं.
“मत मागायला इथे कुणी आलं ना तर मला त्यांना विचारायचंच आहे की घराच्या लाभार्थींच्या यादीत माझं नाव नाही, पण मतदार यादीत कसं काय येतं?” ती वैतागून विचारते. पार्वतीचे पती मनरेगावर मजुरी करायचे. पण पाच वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला तेव्हापासून ते काम बंद झालं. सध्या ते अधून मधून वाराणसीच्या मजूर अड्ड्यावर जाऊन थांबतात. तिथे दिवसाला ४००-५०० रुपये रोज मिळतो.
मनरेगामध्ये अकुशल कामगारांना वर्षातून १०० दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे. पण वाराणसी जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून एकच तक्रार ऐकू येते. ती म्हणजे “गेल्या दोन प्रधानीं”पासून म्हणजेच सरपंचाच्या दोन कार्यकाळांपासून किंवा सुमारे १० वर्षांपासून इथे वर्षाकाठी फक्त २०-२५ दिवसांचं काम उपलब्ध होतंय.
पार्वतीताईच्या डोक्यावर विनाकारण कर्जाचा बोजा चढला आहे. सरकारची काडीची मदत नाही त्यामुळे तिची सगळी भिस्त आता ठाकूर लोकांच्या शेतातल्या मजुरीवर आहे. पेरणी आणि कापणीच्या काळात दोनेक आठवडे काम मिळतं. त्यासाठी सुमारे १० किलो धान्य हे लोक देतात.




















