हेमंत कावळे त्यांच्या नावासमोर आणखी विशेषणं लावण्याचा आग्रह धरत होता.
“मी सुशिक्षित, बेरोजगार आणि...अविवाहित आहे,” तिशीतला हा तरुण त्याच्या अजूनही अविवाहित असण्यावर आणि त्याच्यासारख्या इतर तरुण शेतकऱ्यांवर कोटी करत होता.
“ सु-शिक्षित. बेरोजगार. अविवाहित.” प्रत्येक शब्द त्याने जोर देत उच्चारला आणि छोट्या पानठेल्यावर बसलेल्या त्याच्यासारख्याच तिशीतल्या त्याच्या मित्रांमध्ये हशा पिकला. आपल्यावर लादल्या गेलेल्या अविवाहितपणाच्या रागाला दाबणारं ओशाळवाणं हास्य. जणू आपल्यावरच विनोद झाल्यासारखं.
“ही आमची खरी समस्या/ ही आमची खरी गत आहे,” अर्थशास्त्रात पद्यव्यूत्तर झालेला कावळे म्हणाला.
आम्ही शेलोडीमध्ये आहोत, यवतमाळ- दारव्हा मार्गावरचं विदर्भातल्या कापूसपट्ट्यातलं हे गाव. शेतकरी आत्महत्याग्रस्त असणारा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील हा प्रदेश. शेती संकट आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणारा. कावळे आणि तरुणांचा एक गट गावच्या मुख्य चौकात एका छोट्या टपरीच्या शेडखाली आरामात बसले आहेत. या सर्वांनी पदवी किंवा पद्व्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे; प्रत्येकाच्या नावावर जमीन आहे. आणि हे सर्व जण बेरोजगार आहेत. यातील कोणाचेही लग्न झालेले नाही.
यातील बऱ्याच जणांनी लांबच्या शहरांमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर किंवा अमरावतीमध्ये त्यांचं नशीब आजमावलं आहे. तुटपुंज्या पगारासाठी काम केलं आहे. ते राज्याच्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षांना बसलेत, अयशस्वी ठरलेत.
या भागातील आणि कदाचित देशभरातील बहुतेक तरुणांप्रमाणेच नोकरी मिळवण्यासाठी चांगलं शिक्षण हवं हाच कावळे याचा विचार.
आता त्याच्या लक्षात येतंय की वधू मिळवण्यासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या पाहिजे.
नोकरी मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्याने कावळे आता पुन्हा घरच्या शेतीकडे परतले आहेत. याला जोडधंदा म्हणून गावात त्याने ठेला टाकला आहे.
"मी पानाचा ठेला टाकायचं ठरवलं, एका मित्राला रसवंती चालवण्यास सांगितलं आणि दुसऱ्या मित्राला स्नॅक्सचे दुकान लावायला लावलं. आपण काही तरी व्यवसाय तर करून पहावा, म्हणून,” हेमंत सांगतो. “पुण्यात राहून अख्खी चपाती खायची त्या ऐवजी गावात राहून अर्धी चपाती खाणं कधीही चांगलंच,” तो म्हणतो.









