“लोकांना वाटतं आम्ही बडे, सधन शेतकरी आहोत,” दादासाहेब सपिके म्हणतात. “आमच्या शेडनेट पाहिल्या की लोकांचा तसा समज होतो. पण आमच्या शेतात येऊन पहा म्हणजे तुम्हाला त्याची काळी बाजू दिसेल. आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. आणि ते कर्ज फेडणं आमच्याने शक्य होईल असं वाटत नाही.”
२० फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला तेव्हा दादासाहेब शांतपणे इतरांसोबत चालत होते. त्यांच्याबरोबर होते राजेंद्र भागवत – मोर्चेकऱ्यांमध्ये बाहुल्याने असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांपेक्षा हे दोघंही फार वेगळे आहेत. (राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उर्वरित सर्व मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण केल्या जातील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मोर्चा रद्द करण्यात आला.)



