महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ जून रोजी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत माध्यमांना सांगताना ते म्हणाले की, “राज्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल.” याउलट, ही कर्जमाफी मिळविण्यासाठी लागणाऱ्या अटींची संख्याच सर्वात जास्त आहे.
तेव्हा या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील परुंडी या ओसाड गावच्या बाप्पासाहेब इरकाळ यांना त्या अटी ऐकून हसावं की रडावं हेच कळेनासं झालंय. “[कर्जमाफीची] मर्यादा १.५ लाख रुपये आहे,” ४१ वर्षीय बाप्पासाहेब सांगतात. ते त्यांची पत्नी राधा आणि वडील भानुदास यांच्यासोबत आपल्या १६ एकर शेतातील तण काढत आहेत. “माझ्यावर ९ लाख रुपयांचं कर्ज आहे. जर मी ७.५ लाख रुपये परत करू शकलो, तरच मला १.५ लाख रुपये माफ होतील.”
राधा म्हणतात त्याप्रमाणे २०१२-१५ या काळात आलेल्या दुष्काळामुळे पीक वाया गेलं आणि त्यांच्यावर असणारं बँकेचं कर्ज वाढत गेलं. २०१४ मध्ये त्यांनी जवळच्या तलावातून शेतातल्या विहिरीला पाणी यावं म्हणून ४ किमी लांब पाईपलाईन टाकली. “पण या वर्षीही पाऊस पुरेसा पडला नाही,” त्या सांगतात, “तूर आणि कपास वाळून गेली. फडणवीसांनी कर्जमाफी जाहीर केली तेव्हा आम्हाला शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, पण ही थट्टा नाही तर काय आहे? जर आमच्याकडे परत करण्यासाठी एवढे पैसे असते, तर आज आमच्या डोक्यावर एवढं कर्ज तरी राहिलं असतं का?”



