जानू वाघे आणि इतर १५ कातकरी आदिवासी – महाराष्ट्रात या समाजाची विशेषत: कमकुवत आदिवासी गट (Particularly Vulnerable Tribal Group) म्हणून नोंद आहे – समृद्धीने ओसंडून वाहणार आहेत. फरक इतकाच की ती समृद्धी त्यांच्यासाठी नसेल. ठाणे जिल्ह्यातला त्यांचा लहानसा पाडा महाराष्ट्र शासनाच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे लवकरच जमिनदोस्त होणार आहे.
“ह्ये माजं घर हाय. सगला जनम इथंच गेला. माजा बाप आणि आजुबा इथंच राइले. आता ते [महाराष्ट्र शासन] आमाला जायला सांगतायत. आमाला अजून नोटीस बी [लिखित] दिली नाय,” ४२ वर्षांचे जानू सांगतात. “आमी इतून आता कुठं जायंच? कुठं आमची घरं बांधायची?”
त्यांची झोपडी भिवंडी तालुक्यातल्या चिराडपाडा गावापासून अर्धा किलोमीटरवर आहे. मध्ये बांबूची भिंत घालून दोन खोल्या केल्या आहेत, पलीकडे मातीची चूल असलेलं स्वयंपाक घर आहे. जमिन शेणानं सारवलेली आहे, भिंती कुडाच्या आणि झोपडीला लाकडाच्या खांबांचा आधार आहे.
एका आड एक दिवशी जानू सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ पर्यंत भातसा नदीत मासे पकडतात. त्यांची बायको वासंती डोक्यावर ५-६ किलो माशांच्या टोपलीचं ओझं घेऊन, सहा किलोमीटर अरूंद आणि खडबडीत पायवाट तुडवत पडघा बाजारात जाते. महिन्यातले जवळजवळ १५ दिवस, दिवसाला ४०० रुपये अशा कमाईत त्यांच्या चार जणांच्या कुटुंबाचं भागतं. अधून मधून जानू आणि वासंती चिराडपाड्यावरच्या शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीही करतात. काकडी, वांगी, मिरची अशा भाज्यांच्या तोडणीचे दिवसाचे प्रत्येकी २५० रुपये कमावतात.










