पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यामध्ये राजमहाल रांगांच्या पूर्वेकडच्या टेकड्या पहायला मिळतात. इथल्या सुपीक पठारी भूमीवर कधी काळी लाव्हा रस वाहत येऊन जास्तीत जास्त ५०० मीटर उंच असणारे हे सडे तयार झाले असावेत. या टेकड्यांमध्ये ज्वालामुखीतून तयार झालेला काळा पाषाण आढळतो. खूप पूर्वी इथे हत्ती, वाघ, अस्वलं, बिबटे, हरणं आणि इतरही अनेक वन्यजिवांची वस्ती होती.
बिरभूमच्या नलहाटी तालुक्यातल्या अशी टेकड्यांपैकी एक म्हणजे बोरुडी पहाड. इथला दगड रस्ते बांधणीसाठी, रेल्वेच्या रुळांखाली अंथरण्यासाठी आणि इमारतीच्या बांधकामावर बारीक खडी करून वापरला जातो. अगदी ३० वर्षांपूर्वीपर्यंत या डोंगरांवरच्या सड्यांवर जंगल तरी होतं किंवा संथाल लोक तिथे शेती करत होते. त्यानंतर मात्र तिथे दगडखाणी आल्या आणि भारतभरातल्या रस्ते बांधणी आणि एकूणच तेजीत असलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी लागणारा दगड इथून खोदला जाऊ लागला. सुरुंग लावून स्फोट केल्यानंतर जवळच्या खडी केंद्रांवर त्याची बारीक खडी पाडली जाते आणि इथून तो बाहेर पाठवला जातो.
२०१५ साली एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणात केलेली ही सफर तुम्हाला टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भबानंदपूर गावापासून ते वरती बोरुडी पहाड पर्यंत सैर करून आणेल.
मजुरांमध्ये जास्तकरून संथाल – बाया, गडी आणि तरुण मुलांचा समावेश आहे, ज्या गावातली शेतंभातं या उद्योगाने उद्ध्वस्त केली तिथलीच ही माणसं. बहुतेक जण स्थानिक आहेत पण काही जण झारखंडमधून आलेत जे काहीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथेही खाणकामाने गावं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतीवर आधारित उपजीविका नष्ट झाल्या आहेत. संरक्षक साहित्य म्हणून ते ज्या काही गोष्टी वापरतात त्या कामचलाऊ आहेत. पायात बूट, हेल्मेट, तोंडावरचा संरक्षक मास्क, शौचालय आणि पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा आणि अपघात झाल्यास भरपाई अशा कोणत्याही सुविधा खाणमालक पुरवत नाहीत.
घासीराम हेम्ब्रोम या सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं की २०१४ च्या जून महिन्यात भबानंदपूरची एक संताल महिला या रस्त्याने जात असताना भर दिवसा खडी केंद्रचालकाने तिला पकडून तीन तास तिच्यावर बलात्कार केला. ती इतकी घाबरली होती की त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची तिची हिंमत झाली नाही.
एवढा रस्ता पार केल्यानंतर आमचं वाहन खाण उद्योगाच्या काही कचेऱ्यांजवळून पुढे गेलं. तिथे फोटो काढणं हिताचं नव्हतं. या सगळी भाग दगडखाण “माफियां”च्या ताब्यात आहे आणि कॅमेरा घेऊन आलेल्या बाहेरच्या कुणालाही मारहाण करायला ते पुढे मागे पाहत नाहीत. त्यामुळे इथून पुढचं छायाचित्र आहे बोरुडीच्या वरच्या चंदननगर या पहिल्या गावाचं. तिथून भबानंदपूर कसं दिसतं ते पहा.































