“पण, आजही काही जण अंत्यविधीच्या वेळी पराई वाजवतात, पण त्यांना कुणी कलावंत म्हणत नाही. अगदी लोककलांसाठी [राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या] कलईममनी पुरस्कारांमध्ये देखील पराईची दखल कुणी कलाप्रकार म्हणून घेत नाहीत,” ते आपली खंत व्यक्त करतात. पण मणिमारन यांना समाजाचा अस्पृश्यतेचा आणि काहीही संबंध नसल्याचा जो आव आहे त्याच्या पलिकडे पराईला घेऊन जायचंय. त्यामुळे ते आठवड्याला नियमित वर्ग घेतात आणि दर वर्षी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करतात. आणि या शिबिरांना समाजाच्या सगळ्या स्तरातून विद्यार्थी येतायत. सगळ्यांनाच हे ठेक्यात आणि ठसक्यात वाजणारं तालवाद्य शिकायचंय. आणि ते वाजवतानाच त्या वाद्याचं राजकारणही त्यांना शिकता येतं. अर्थात लॉकडाउनच्या काळात आता प्रत्यक्ष भरणारे वर्ग मात्र रद्द करण्यात आले आहेत.
मणिमारन सांगतात की त्यांनी या विषाणूबद्दल गाणं तयार करायचं ठरवलं कारण त्यांनी काही ‘गान’ (चेन्नईतील लोकगीताचा प्रकार) ऐकली, ज्यात याबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. “काही कलावंत अफवा ऐकून गाणी करत होते असं वाटतं. आता हेच घ्या, कोरोना [विषाणू] मांसाहारी खाण्यातून पसरतो असा लोकांचा समज झालाय. एक लक्षात घ्या, मांसाहारी खाण्याला विरोध करणारी एक मोठी राजकीय यंत्रणा आधीपासूनच अस्तित्वात आहे, आणि आता कोरोनाचं निमित्त करून ते त्यांची पोळी भाजून घेतायत. म्हणून मग आम्हाला हे गाणं रचावं लागलं.”
तसंही कोणतंही संकट आलं तरी त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या कलावंतांमध्ये मणिमारन आघाडीवर असतात. “माझं स्पष्ट मत आहे की कला ही नेहमीच राजकीय असते. आणि त्यामुळे कोणत्याही कलाकाराने समाजात, त्याच्या अवतीभोवती काय सुरू आहे याबद्दल व्यक्त व्हायलाच पाहिजे. लोककलावंत आणि गान कलाकारांनी हे केलंय, संकटकाळात त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं कर्तव्य पार पाडलंय. आणि खरं तर खोटे दावे खोडून काढण्यापेक्षाही आमचं कोरोना गाणं त्याबद्दल जागरुकता निर्माण करतं.”
२००४ साली आलेल्या त्सुनामीनंतर जो काही हाहाःकार उडाला आणि त्यानंतर २०१८ साली गज वादळाने तमिळ नाडूतल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडवली, तेव्हाही मणिमारन यांनी आपल्या गाण्यांमधून या संकटाने उद्ध्वस्त झालेल्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचं काम केलं होतं. “लोक कला ही मुळात लोकांची कला आहे. आणि जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा लोकांच्या बाजूने उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही कुणाला पैसे दान करू शकत नाही. म्हणून मग आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतो,” मगळिनी त्यांच्या नव्या, कोरोना गाण्याबद्दल म्हणतात.