किती तरी शतकांपासून राजस्थानातल्या पाली जिल्ह्यातल्या सादरी गावातला राइका समुदाय उंट पाळतोय. २०१४ साली राजस्थानात उंट हा राज्य प्राणी घोषित करण्यात आला. अनेकांच्या मनात या बहुरंगी राज्याची जी प्रतिमा आहे, वाळवंट, त्याचं जणू हा प्रतिनिधीत्व करतो. पशुपालकांसाठी उंट फार मोलाचे आहेत कारण ते इथल्या उष्णतेचा मुकाबला करू शकतात, कमी पाण्यावर राहू शकतात आणि बदल्यात दूध आणि त्यांची लोकर देतात.
पण आज पशुपालक संकटात सापडलेत. त्यांच्या भटक्या आयुष्याशी संबंधित प्रथांबद्दल त्यांना समाजाकडून तिरस्कार आणि अनेकदा दुस्वास अनुभवायला मिळत असल्यामुळे राइकांचं जगणं मुश्किल झालं आहे.
जोगारामजी राइका या समुदायातले ज्येष्ठ, जाणते पशुपालक आहेत आणि अध्यात्मिक गुरू म्हणजेच भोपाजी आहेत. राइका ज्यांना मानतात अशा देवांबरोबर ते संवाद साधतात – त्यांचा मुख्य देव आहे पाबूजी. भोपाजी अनेकदा आत्म्याशी संवाद साधत असताना तंद्रीतही जातात.











