गेली काही वर्षं दिलीप कोळी यांच्यासाठी तशी वादळीच म्हणावी लागतील - वादळं, घटती मासळी आणि मंदावलेला बाजार. तरीही २०२० च्या मार्चमध्ये सुरु झालेला लॉकडाऊन हा त्यांच्यासाठी सर्वात अवघड काळ होता.
“आम्ही आतापर्यंत एवढ्या वर्षांत भोगलेला त्रास हा या गेल्या वर्षीच्या त्रासाच्या निम्माही नव्हता”, ५० वर्षीय दिलीप सांगतात. ते मच्छीमार आहेत आणि दक्षिण मुंबईच्या कुलाब्यात कोळीवाड्यात राहतात. मासेमारी करायला लोक तयार होते, मासे खायलाही लोक तयार होते, पण (सप्टेंबर २०२० पर्यंत, टाळेबंदीमुळे) माशांची विक्री होऊ शकत नव्हती. सर्व बाजार बंद होते आणि आम्ही आणलेली मासळी आम्हाला परत समुद्रात टाकावी लागत होती.”
दिलीप गेल्या ३५ वर्षांपासून दक्षिण मुंबईच्या ससून डॉक इथे काम करत आहेत. त्यांच्या तीन बोटी आहेत आणि आठ-दहा मच्छीमार त्यांच्याकडे काम करतात. “लॉकडाऊनमध्ये निदान आम्हाला रेशन तरी मिळू शकत होतं, पण इतर गरीब मच्छीमारांकडे तर अन्नधान्य किंवा पैसा काहीच नव्हतं,” ते म्हणतात.
मच्छीमारांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो. समुद्रात येऊन-जाऊन ४० मिनिटांच्या अनेक खेपा ते करतात. मान्सूनच्या महिन्यांमध्ये ते किनाऱ्यापासून फार आत जात नाहीत. भरती-ओहोटीच्या बदलाच्या वेळी ते किनाऱ्यावर तासाभराची विश्रांती घेतात आणि पुन्हा समुद्रात जातात. “आम्ही सकाळी लवकर काम सुरु करतो आणि दुपारी २ किंवा ३ वाजेपर्यंत काम संपवतो. आम्ही चंद्राच्या कलांवरून भरतीचा अंदाज बांधतो. फक्त ऐन भरती आणि ओहोटीच्या वेळी आम्ही मासेमारीसाठी जात नाही,” दिलीप सांगतात.
त्यांच्या बोटीवर काम करणारे सर्व मच्छीमार हे कोळी समुदायातील आहेत, त्यांच्यापैकी काही जण रेल्वेने किंवा भाड्याच्या वाहनाने, वाशी हवेली या गावातून जवळपास दीडशे किलोमीटर प्रवास करत दक्षिण मुंबईतील ससून डॉकपर्यंत येतात. १०४० लोकसंख्या असलेलं (जनगणना, २०११) हे गाव रायगड जिल्ह्यातील तळा या तालुक्यात आहे. तिथे ते साधारणपणे जूनपासून ऑगस्टपर्यंत म्हणजे गणपती उत्सवापर्यंत काम करतात. बाकी वर्षभर ते महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील भागांमध्ये- मुख्यतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जातात आणि इतर लोकांच्या बोटींवर काम करून दर महिन्याला १०,००० – १२,००० रु. मिळवतात.























