राम वाकचौरे रोज सकाळी घराजवळच्या मंडईतून २७५ मुलांसाठी भाजी खरेदी करतात – ३ किलो बटाटे, फ्लॉवर, टोमॅटो वगैरे. “सगळ्या भाज्यांच्या किंमती मला तोंडपाठ आहेत. गाडीला पिशव्या लटकवायच्या आणि शाळेला निघायचं,” विरगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे वाकचौरे सांगतात.
जून महिन्यात अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या कळसगावचे रहिवासी असणाऱ्या ४४ वर्षीय वाकचौरेंची बदली तिथून २० किमीवर असणाऱ्या विरगाव इथे करण्यात आली. कळसगावच्या प्राथमिक शाळेत त्यांची १८ वर्षं नोकरी झाली होती. सध्या त्यांचं प्रमुख काम आहे (राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण पोषण आहार कार्यक्रमांतर्गत) मध्यान्ह भोजन योजनेची नीट अंमलबजावणी करणं.
“आता मुख्याध्यापक थोडीच सगळी कामं करू शकणारेत, मग त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिल्यायत,” मध्यान्ह आहार योजनेच्या रजिस्टरवरून नजरही न हटवता ते सांगतात. “सरकारी नोकरीमुळे जरा स्थैर्य येतं, पण मी शिक्षक आहे असंच मला वाटेनासं झालंय.”
वाकचौरे अभ्यासाशिवाय जी जी कामं करतात ती काही फार आगळी-वेगळी नाहीत – महाराष्ट्रातल्या जि.प. शाळांच्या शिक्षकांना नेमाने बिगर-शैक्षणिक कामं दिली जातात. त्यामुळे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शिकवायलाच वेळ उरत नाही.
विरगावच्या सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेतले वाकचौरेंचे सहकारी ४२ वर्षीय सबाजी दातीर यांच्या सांगण्यानुसार ही कामं १०० हून अधिक भरतील. दर आठवड्याला दातीरांचे अशा बिगर-शैक्षणिक कामांवर सरासरी १५ तास जातात. “ही कामं नेमकी शाळेच्या वेळेतच [रोज चार तास] येतात,” ते सांगतात. “आम्ही शक्य होईल तसं शाळेनंतर थांबून कामं पूर्ण करतो.” आणि जेव्हा कामं एकाच वेळी येतात तेव्हा मात्र अभ्यास सोडून इतर कामांना प्राधान्य दिलं जातं.









