"तू कुत्र्याला मारलंस का?" त्यांनी विचारलं. आणि सुनंदा साहूनी काही उत्तर देण्याच्या आतच दंडुक्याचा एक प्रहार तिच्या डोक्यावर झालेला होता. त्यानंतर तिला आठवतं तेव्हा ती थेट दवाखान्यात होती.
कुत्र्याचं केवळ निमित्त होतं. त्यांना तो पसंत नव्हता. ज्या भावांनी तिच्या वेण्या घातल्या होत्या आणि जे तिला बाहुली म्हणायचे ते आता निर्दय असे परके झाले होते. सुनंदाने एक भटका गावठी कुत्रा पाळला त्याच्या फार आधीपासून. "तू मर नाही तर इथून दूर निघून जा – रोज ते मला हेच सांगायचे. त्या कुत्र्याला थोपटलं की माझा एकटेपणा जरा कमी व्हायचा. मी काळू म्हणायचे त्याला," ती सांगते.
ही मारहाण झाली २०१० मध्ये, सुनंदा घरी परतली त्यानंतर सहा वर्षांनी, तिचे आजारी, अंथरुणाला खिळलेले वडील कृष्ण नंद साहू वारले त्यानंतर दोन महिन्यांनी. आपली मुलं, सुना आणि त्यांच्या लेकांनी आपल्या मुलीची जी अवहेलना केली ती निमूटपणे त्यांनी पाहिली होती. त्यांची पत्नी, कनकलता, त्यांनीही गप्प राहणंच पसंत केलं होतं.
सुनंदाला हे स्पष्टपणे दाखवून देण्यात आलं होतं की ती कुणालाच नको आहे आणि तिची कुणाला गरजही नाहीये. "ते मला साधा साबण किंवा तेलही देत नसत," ती सांगते. खाणं तर अगदीच मोजून मापून. तेव्हाच कधी तरी तिच्याबद्दलच्या काळजीने एका शेजारणीने एका सामाजिक कार्यकर्तीला तिची परिस्थिती सांगितली, जिने गावाच्या पंचायतीकडून मदत घेण्यासाठी सुनंदाला प्रोत्साहित केलं. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या निराधार स्त्रियांसाठी महिना रु. ३०० च्या रुपाने काही तरी मदत मिळाली. आणि अंत्योदय योजनेअंतर्गत महिन्याला स्वस्तात २५ किलो तांदूळ मिळू लागला.
निहाल प्रसाद गावात (ता. गोंदिया, जि. धेनकनाल, ओदिशा) अनेकांनी सुनंदाच्या भावांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. "पण त्यांनी काहीच केलं नाही," या गावकऱ्यांपैकी एक, ४५ वर्षांचे रमेश मोहंती सांगतात.
या भावांना बहिणीसाठी कसलीच दयामाया नव्हती. त्यांच्या मते तिने घराण्याचं नाव खराब केलं होतं. "माझ्याशी कसलाही संबंध ठेवला तर आम्ही घर सोडून जाऊ असं माझ्या भावजयांनी माझ्या भावांना धमकावलं होतं," सुनंदा सांगते.
सुनंदाने मुळातच जे पातक केलं होतं त्याची ही शिक्षा होती – प्रेम करण्याचं पातक. मात्र जेव्हा तिने यापुढे जाऊन त्याहूनही भयंकर अशी कृती केली तेव्हा मात्र त्यांनी अधिकच क्रूर पद्धतीने तिचा समाचार घ्यायचं ठरवलं.
२०१६ च्या मे महिन्यात, ३६ वर्षांच्या सुनंदाने दिवंगत वडलांच्या नऊ एकर शेतजमिनीतला आपला हिस्सा मागितला. "माझ्या दोन बहिणींच्या लग्नासाठी जमीन विकली होती. पण माझं काही लग्न झालं नव्हतं त्यामुळे उरलेल्या जमिनीवर माझाही समान हक्क होता."
सुनंदाची ही मागणी मान्य होणं अशक्य होतं आणि यासाठी तिला माफी नव्हती. ही अशी भूमी आहे जिथे २०१०-११ च्या जनगणनेनुसार एकूण जमीन मालकीत पुरुषांचा वाटा (सरकारी जागा वगळता) ८७.२% इतका आहे. स्त्रिया १२.८% इतक्या किरकोळ प्रमाणात जमिनीच्या मालक आहेत.
तिने रागाच्या भरात काळूला मारलं हा बहाणा पुढे करत तिच्या भावांनी एक दिवस तिला दुपारी मारहाण केली. "उद्या ती आपल्याला मारायला कमी करणार नाही," लाकडाच्या दंडुक्याने तिला हाणताना तिचे स्वतःचेच भाऊ असं ओरडत होते.





