मदुराईतल्या आमच्या घरासमोर रस्त्यात दिव्याचा एक खांब होता. मी या खांबाशी किती तरी गप्पा मारलेल्या आहेत, ज्या स्मृतीतून पुसल्याच जाणार नाहीत. त्या रस्त्यावरच्या दिव्याशी माझं एक खास नातं आहे. किती तरी वर्षं, अगदी माझी शाळा संपेपर्यंत आमच्या घरी वीज नव्हती. २००६ साली जेव्हा वीज आली तेव्हा आम्ही एका ८ बाय ८ च्या खोलीत राहत होतो. एकच खोली आणि माणसं पाच. त्यामुळे तर मी त्या दिव्याच्या खांबाशी माझं जास्तच जवळचं नातं निर्माण झालं.
माझ्या लहानपणी आम्ही कित्येक घरं बदलली. आधी एक झोपडी होती, तिथून मातीच्या घरात, तिथून एका भाड्याच्या खोलीत आणि नंतर आम्ही सध्या राहतोय त्या २० बाय २० च्या घरात. गेल्या १२ वर्षांच्या काळात माझ्या आई-वडलांनी हे घर अक्षरशः एकेक वीट रचत स्वतःच्या हातानी बांधलं आहे. एक गवंडी कामासाठी घेतला होता पण बांधकाम सुरू असताना त्यांनी स्वतः काम केलं आणि पूर्ण बांधून होण्याच्या आत ते तिथे रहायला पण आले. आम्ही आजवर जिथे कुठे राहिलो ती सगळी घरं त्या दिव्याच्या खांबाच्या परीघात आहेत. उजेडाच्या त्याच वर्तुळात बसून मी चे ग्वेवेरा, नेपोलियन, सुजाता आणि इतरांची पुस्तकं वाचली आहेत.
अगदी आताही मी हे सगळं लिहितोय, ते त्याच दिव्याच्या उजेडात.






























