“राजकारणी लोक केवळ टीव्हीवर वचनं देत असतात,” मंड्या जिल्ह्यातल्या श्रीरंगपट्टण तालुक्यातल्या अंदाजे १५०० वस्तीच्या गाननगोरू गावातले एक शेतकरी, स्वामी म्हणतात.
१२ मे रोजी कर्नाटकात मतदान होणार. त्याआधीच्या जमिनीवरच्या आणि टीव्ही वाहिन्यांवरच्या प्रचारादरम्यान जाहीरनाम्यांद्वारे विखारी राजकीय युद्धं खेळली जातायत. जनता दल (सेक्युलर)च्या जाहीरनाम्यानुसार एका वर्षात सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल, शिवाय शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांवरचं कर्जही माफ करण्यात येईल. भारतीय जनता पक्षानेही राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमधून घेतलेलं एक लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचं वचन दिलं आहे. काँग्रेस पक्षाने कोणत्याही स्वरुपाची कर्जमाफी जाहीर केली नसली तरी पुढच्या पाच वर्षात (२०१८-२०२३) “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं” आणि सिंचनावर १.२५ लाख कोटी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचं कबूल केलं आहे. भाजप आणि जद (से) या दोन्ही पक्षांनी पुढील पाच वर्षांच राज्यभरातल्या सिंचन प्रकल्पांवर १.५ लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे.
पण गाननगोरूचे शेतकरी ही पोकळ आश्वासनं ऐकून कंटाळले आहेत. “त्यापेक्षा [टीव्हीवर आश्वासनं देण्यापेक्षा] राजकारणी लोकांनी कावेरीचा तंटा सोडवावा म्हणजे मग आम्हाला आमच्या रानात पिकं घेता येतील आणि मग चार घास खाऊन लोक जगतील तरी,” स्वामी म्हणतात (आपलं फक्त नावच वापरावं असं या गावातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं)






