“स्वातंत्र्य,” सुंदर बगारियांच्या सांगण्यानुसार, “फक्त श्रीमंत आणि बलवानांसाठी आहे.” गेली तीस वर्षं गुजरातमधील बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर काला घोडा सर्कलपाशी, भारताचे छोटे झेंडे सुंदर विकतायत. “काही दिवस आम्ही थोडं जास्त खातो, काही दिवस कमी आणि खूप दिवस तर आम्ही रिकाम्या पोटी निजतो...” त्या सांगतात.
दर दिवशी त्यांच्यासारखेच बगारिया समुदायाचे सुमारे २० जण इथे छोट्या टपऱ्या/पथाऱ्या टाकतात. सकाळी ९ वाजता दिवसभराच्या कामाची तयारी सुरू होतेः रस्त्यात अंथरलेल्या प्लास्टिकच्या कागदावर स्टायरोफोमची खोकी ठेवलेली असतात, त्यावर झेंडे अडकवायचे, तिरंगी बॅज लावायचे, स्टिकर आणि मनगटात घालायचे बॅण्ड स्टायरोफोमच्या उभ्या कागदाला अडकवायचे. काही झेंडे पदपथावरच्या खांबांना अडकवायचे. बाकी तिरंगी टोप्यांसोबत प्लास्टिकच्या कागदावर मांडायचे.
रात्री ११ वाजता त्यांचं दुकान बंद होतं, १४ तासात त्यांची सुमारे २०० रुपयांची कमाई होते. काही जण फतेहगंज उड्डाणपुलापाशी जातात, काही जण सयाजीगंज भागातल्या रेल्वे स्थानकापाशी, काही जण गिऱ्हाइकाच्या शोधात वर्दळ असणाऱ्या इतर चौकांमध्ये थांबतात.
सगळ्यांकडे हंगामानुसार माल विकायाल असतो – झेंडे, राख्या, मेणबत्त्या, सांता टोप्या.
त्यांच्यातलीच एक आहे, १६ वर्षांची लक्ष्मी बगारिया (शीर्षक छायाचित्र पहा), जी सहा वर्षांची असल्यापासून झेंडे विकतीये. ती तिच्या नातेवाइकांसोबत राजस्थानातल्या टोंक जिल्ह्यातल्या उनैरा तहसिलाच्या काकोड गावातून इथे वर्षातून तीनदा येते – स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि नाताळ. “महानगरपालिकेचे लोक येऊन आम्हाला इथनं निघून जायला सांगतात, पण काही तरी करून आम्ही परत येतोच,” ती सांगते.









