तम्मीगमल काशिमिया चष्म्यातून नीट पाहत कापडावर आरशाचा एक छोटासा तुकडा लावतायत. “हा संगळी टाका सगळ्यात अवघड, कारण आरसा बिलकुल निसटून चालत नाही,” त्या मला सांगतात. तमिळ नाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातल्या सिट्टिलिंगी खोऱ्यातल्या दोन लमाणी तांड्यैपैकी, अक्कारे काट्टू तांड्यावरच्या त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो.
गेली १२ वर्षं साठीच्या तम्मीगम्मल किंवा ‘गम्मी’ यांनी आरशापेक्षाही फार मोलाचं असं काही निसटू दिलं नाहीये. आपली मैत्रीण आर. नीला यांच्या संगतीने त्यांनी त्यांच्या समुदायाच्या तरूण मुलींना घाटेर ही लमाणी भरकामाची कला शिकवलीये. ही कला लोकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून ही सगळी खटपट. या कलेमुळे जी कमाई होऊ लागलीये त्यामुळे या बायांवर स्थलांतर करण्याची वेळ येत नाहीये हे म्हणजे दुधात साखर.
लमाणी बाया शक्यतो सिट्टिलिंगीपासून २०० किलोमीटरवर असणाऱ्या तिरुप्पूरच्या कापड गिरण्यांमध्ये किंवा बांधकामांवर कामाला जातात. गड्यांना केरळमध्ये बांधकामावर किंवा झाडं तोडण्याची कामं मिळतात. या स्थलांतरित कामगारांची महिन्याची कमाई सरासरी रु. ७,००० ते रु. १५,००० इतकी असते.
तमिळ नाडूमध्ये लमाणी (मागास जातींमध्ये समाविष्ट) बहुतकरून धर्मापुरी आणि तिरुअन्नमलई जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहेत. ग्राम पंचायत अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, सिट्टिलिंगीमध्ये ९२४ लमाणी राहतात (इतर राज्यांमध्ये त्यांना बंजारा म्हणूनही ओळखलं जातं). सिट्टिलिंगीच्या बहुतेक लमाणी कुटुंबांकडे पावसावर अलवंबून असलेली एक-दोन एकराची पोटापुरती शेती आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात जास्त पाणी लागणाऱ्या ऊस किंवा भातासारख्या पिकाकडे लोकांचा ओढा आहे, त्यात अपुरा पाऊस यामुळे पैशाची गरज सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळेत दोन आठवड्यासाठी किंवा अगदी वर्षभरासाठी लोक कामानिमित्ताने स्थलांतर करू लागलेत.
“स्थलांतर हे इथल्या जगण्याचं वास्तव आहे, पण ज्या घरांमध्ये बाया घाटेर विणून पैसे कमवतायत, तिथे मात्र स्थलांतर थांबलंय,” असं ३५ वर्षांच्या तैकुलम यांचं म्हणणं आहे.











