पहिल्या प्रथम पेरुवेम्बा म्हणजे कातडं कमवण्याचा कारखाना वाटू शकतं. गावात घराच्या अंगणांमध्ये गायी, बैल आणि बकऱ्यांचं कातडं वाळत घातलेलं असतं, जणू काही इथे चामडं विकलं जात असावं. पण अंगण ओलांडलं की घरांमध्ये, याच चामड्यापासून अतिशय उत्तम नाद असणारी तालवाद्यं बनतात. आणि ते बनवणारे हात आहेत कडची कोल्लन कारागिरांचे.
दक्षिण भारतात सगळीकडेच पेरुवेम्बामध्ये चामड्यापासून बनवलेल्या तालवाद्यांना मागणी असते. केरळमध्ये पलक्कडपासून १४ किलोमीटरवर हे गाव आहे. “आम्ही काही संगीतकार नाही आणि आम्हाला काही ही वाद्यं वाजवता येत नाहीत. पण आम्हाला चांगल्या दर्जाची वाद्यं बनवण्यासाठी आवश्यक असलेलं श्रुतींचं ज्ञान मात्र आहे,” कडची कोल्लन बनवणारे, ४४ वर्षीय के. मणीकंदन सांगतात. “मागणी आल्यावरच आम्ही वाद्य बनवायला घेतो. घेणाऱ्याच्या मागणीनुसार वाद्यात फेरफार केले जातात. आम्ही दुकानांना किंवा व्यावसायिक विक्रेत्यांना वाद्यं विकत नाही.”
पेरुवेम्बाचे कडाची कोल्लन मृदंग, मड्डालम, चेंडा, तबला, ढोल, गंजिरा आणि इतर ढोलवाद्यं बनवतात, जी जास्त करून देवळांमध्ये आणि कर्नाटकी संगीतात वापरली जातात. गेली २०० वर्षं हा समाज तालवाद्यं तयार करतोय. त्या पूर्वी ते धातूचं काम करणारे कारागीर होते आणि शेतीसाठी अवजारं बनवायचे असं मणीकंदन सांगतात. पलक्कड हे कर्नाटकी संगीताच्या केंद्रस्थानी असल्याने पेरुवेम्बाच्या कडाची कोल्लन समाजाला वाद्यं बनवण्याची प्रेरणा मिळाली, आणि त्यातून मिळू शकणाऱ्या अधिकच्या उत्पन्नाचीही. पेरुवेम्बा पलक्कड जिल्ह्याच्या पेरुवेम्बा ग्राम पंचायतीत येतं.
विख्यात मृदंग विशारद पालघाट टी. एस. मणी अय्यर (१९१२-१९८१) यांनी इथे बनवलेला मृदंग वाजवला आणि त्यानंतर, पेरुवेम्बाची ख्याती केरळच्या बाहेर कर्नाटकी संगीतक्षेत्रात पसरू लागली. त्यांनी मद्रासच्या (आता चेन्नई) संगीतकारांना या गावी बोलावलं आणि त्यानंतर यातले अनेक कायमसाठीच इथल्या कडाची कोल्लन कारागिरांचे ग्राहक झाले. अय्यर यांचे स्वतःचे मृदंग मणीकंदन यांचे वडील, पेरुवेम्बाचे कृष्णन मृदलपरम्बू यांनी बनवले होते आणि त्यांच्यासोबत अय्यर यांची घट्ट मैत्री होती.








