“हा काही ढोल नाहीये,” सविता दास त्याकडे बोट दाखवून म्हणते – तो खरं तर ढोलच असतो.
आपल्यासमोर मोजकेच पर्याय असले तरी त्यात बंदिस्त न होता बिहारच्या पटणा जिल्ह्यातल्या धिबरा गावच्या बायांच्या या गटाने चरितार्थासाठी एक आगळा वेगळा पर्याय निवडायचं ठरवलं. लागवडीखालची जमीन आणि तसंही कमी मजुरी देणारी शेतमजुरी – दोन्ही घटत असताना त्यांनी हातात टिपरू घेतलं. सुरुवात सोळा जणींपासून झाली. पण घरच्यांचा दबाव आणि सततच्या टिकेच्या माऱ्यापुढे सहा जणी झुकल्या आणि त्यांनी माघार घेतली. ज्या दहा टिकून राहिल्या – त्या सगळ्यांचं आडनाव दास – त्यांनी २०१२ साली राज्यातला फक्त स्त्रियांचा असा पहिला बँड सुरू केला – सरगम महिला बँड.







