“सकाळपासूनची माझ्या गाढवाची ही तिसरी खेप आहे, पाणी घेऊन टेकडी चढण्याची,” नि:श्वास टाकत डाली बाडा म्हणाल्या. “ते इतकं थकतं, पण त्याला द्यायला आमच्याकडे पुरेसा खुराकही नसतो.”
५३ वर्षीय डाली बडांच्या घरी आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा त्या गाढवाला गवत आणि उडदाची शिळी डाळ चारत होत्या. बाडाजी, त्यांचे पती, आकाशाकडे नजर लावून होते – जूनचे दोन आठवडे उलटून गेले होते. “मला वाटतं पाऊस येईल,” ते राजस्थानच्या बाग्री बोलीत म्हणाले. “पावसाळ्यात पाणी खूप गढूळ होतं आणि माझ्या बायकोला गाढवासोबत जाऊन ते खराब पाणी भरावं लागतं.”
उदयपूर पासून ७० किलोमीटरवरील असलेल्या उदयपूर जिल्ह्याच्या रिषबदेव तहसिलातील १००० वस्तीच्या पाचा पडला गावातील माणसं आणि जनावरं एकाच पावसाळी ओढ्यातील पाणी पितात. तो सुकतो तेव्हा लोक जमिनीत खड्डे खणून त्यातील पाणी वापरतात. पाऊस पडल्यावर या खड्ड्यात कचरा भरतो आणि स्वच्छ पाण्याच्या आशेत इथले रहिवासी नवे खड्डे खोदतात. अनेक कुटुंबे आपली गाढवं घेऊन टेकडीवर पाणी घेऊन जातात. इतर खेड्यात या गावाची ओळख ‘गाढवं पाणी भरतात ते गाव’ अशीच आहे.
गाढवांनी भरलेलं हे पाणी घरातील सर्वच कामांसाठी वापरलं जातं पण बायका बहुतेक वेळा आपली धुणी-भांडी ओढ्यावरच नेतात. इथल्या रहिवाश्यांच्या मते गाढवं ही एक गुंतवणूक आहे जी वर्षानुवर्षे पाणी भरून परतावा देत असते.






