दर वर्षी जुलैच्या महिन्यात महाराष्ट्रात लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातल्या देहू आळंदीहून सोलापूरच्या पंढरपूरला असणाऱ्या आपल्या लाडक्या विठोबा आणि रखुमाईला भेटण्यासाठी पायी निघतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या पशुपालकांच्या पायवाटांवरून, गेल्या ८०० हून अधिक वर्षांपासून ही पायी वारी चालू आहे, अव्याहत.
देहू ही संत तुकारामांची जन्मभूमी आणि आळंदी, संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान. समानतेचा पुरस्कार करणाऱ्या भक्ती पंथाचे हे मोठे संत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या देहू-आळंदीला पोचतात आणि मग तिथनं हा दोन आठवड्याचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक गावच्या बाया-पुरुषांची एक दिंडी असते, काही दिंड्या पुण्यापर्यंत येतात तर काही पुण्यातून निघतात. बाकी आपापल्या गावाहून आषाढी एकादशीला पंढरीला पोचण्यासाठी निघतात.



