अगदी पहिल्यांदाच मन्वरा बेवाची टोपली आज रिकामी आहे. कारखाना बंद आहे, गेल्या २० दिवसांपासून मुन्शीचा पत्ता नाही आणि घरच्यांचं पोट भरायला तिच्याकडे मुळी पैसाच नाहीये. मन्वरा म्हणतात की देशात कुठे तरी काही तरी काळं आहे ज्याविरोधात लोक लढतायत आणि त्याच्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली आहे.
१७ वर्षांपासून ४५ वर्षांच्या मन्वरा घर चालवतीये – विड्या वळून – १००० विड्यांमागे १२६ रुपये. नवरा वारल्यानंतर त्याच्यामागे तिने हे काम सुरू केलं. या भूमीहीन कुटंबाला दोघं मुलं, नवरा गेला तेव्हा धाकटा फक्त सहा महिन्याचा होता. तरुणपणी ती दिवसाला २००० विड्या वळायची, आता कसं तरी करून ५०० होतात.
पश्चिम बंगाल सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यातल्या विडी कामगारांपैकी ७० टक्के महिला आहेत. “या भागात एखाद्या मुलीला चांगल्या विड्या वळता येत नसतील तर तिच्यासाठी चांगलं स्थळ मिळणंदेखील मुश्किल आहे,” पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जांगीपूर प्रभागातल्या विडी कारखान्याचे मुन्शी असणारे मुनिरुल हक सांगतात. घरी कच्चा माल देणं आणि वळलेल्या विड्या गोळा करणं हे त्यांचं काम.





