सावरगावमध्ये त्यांच्या घराबाहेर बसलेल्या राधाबाईः सोबत ( डावीकडून ) त्यांच्या जाऊ राजूबाई , पुतणी ललिताबाई खळगे आणि पुतण्या मधुकर
बाबासाहेबांवरच्या ओव्यांमधल्या राधाबाईंनी गायलेल्या पहिल्या पाच ओव्या वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत. पहिली ओवी, भगवान बुद्धाच्या नावाने, ज्याने दलितांच्या उद्धारासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली.
दुसरी ओवी, बाबासाहेबांना, ज्यांना आदराने आणि प्रेमाने भीमराय म्हटलं जातं. जातीच्या अत्याचारांना विरोध करण्याचं बळ त्यांनी दिलं म्हणून दलिताच्या कुळात जन्मलेल्या या हिऱ्याच्या नावाने ही ओवी.
तिसरी ओवी, जगाचं रक्षण आणि पालन करणाऱ्या धम्माच्या नावानं.
चौथी ओवी संघाच्या नावाने. बौद्ध भिक्खूंच्या समुदायाला संघ म्हटलं जातं. या ओवीत बौद्ध धर्माने मांडलेल्या पंचशील मार्गाचं पालन करण्याचं त्या वचन देतात. बुद्धांनी सदाचरणाला महत्त्व देऊन दुःखाचं निवारण करण्याचा अष्टांग मार्ग सांगितला. त्याच्या आचरणासाठी जे पाच नियम सांगितले ते म्हणजे पंचशील.
राधाबाईंची पाचवी ओवी रमाबाई आंबेडकरांच्या नावाने आहे. त्या म्हणतात, मी रमाईला पूजीन, दलित समाजासाठी त्या धन्य अशा माउलीसमान आहेत.
पयली माझी ववी गं, भगवान बुध्दाला
दलिताच्या हितासाठी, बुध्द धम्म काढला
दुसरी माझी ववी गं, बाबा भिमरायाला
दलिताच्या कुळात, हिरा ग जलमला
तिसरी माझी ववी गं, धम्माला नमन
बुध्द धम्म मोठा करील, जगाचे पालण
चौथी माझी ववी गं, संघाला वाहीन
पंचशील तत्वाचे, करीन पालन
पाचवी माझी ववी गं, रमाबाई पुंजीनं
धन्य धन्य मावली, गेली एक होवून