बाजरे सांगतायत ते कचऱ्याचं डंपिंग ग्राउंड आहे त्यांच्या गावात, उरुळी देवाची इथे, पुण्यापासून १७ किलोमीटरवर. दुरून पाहिलं तर कचऱ्याचे डोंगर खऱ्याखुऱ्या टेकड्यांसारखे दिसतात. पण जवळ जाऊन पाहिलं की कळतं की गेल्या ३० वर्षांपासून शाळा, दुकानं आणि घरांच्या जवळ साठत गेलेले हे कचऱ्याचे ढीग आहेत.
१९८१ मध्ये महाराष्ट्र शासनाने पुणे शहरातील कचरा टाकण्यासाठी उरुळी देवाची या गावातली ४३ एकर जागा देऊ केली. २००३ मध्ये फुरसुंगी गावाजवळची आणखी १२० एकर जागा शहराचा अनिर्बंध कचरा टाकण्यासाठी देण्यात आली. मार्च २०१४ पर्यंत पुणे महानगरपालिकेने या दोन जागांवर सुमारे ११०० टन कचरा आणून टाकला आहे. इथल्या गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या आणि आजतागायत चालू असलेल्या विरोधामुळे ऑक्टोबर २०१५ मध्ये हा आकडा ५०० टनापर्यंत खाली आणण्यात आला.
टाकला जाणारा कचरा कमी करण्यात आला असला तरी इथल्या हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण काही कमी होऊ शकलेलं नाही. २०१४ मध्ये इथल्या गावकऱ्यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम प्रभागाच्या पीठाकडे याचिका दाखल केली. काही अंतरिम सूचना करण्यात आल्या आणि राष्ट्रीय हरित लवादाची अंतिम सुनावणी २०१७ च्या ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे.
या कचऱ्यावर कसलीही प्रक्रिया केलेली नसल्यामुळे त्याला सुटणारं पाणी जमिनीत मुरतं आणि त्यामुळे भूजल शेतीसाठी अयोग्य ठरलं आहे. या कचऱ्याच्या पाण्याच्या परिणामाविषयी फुरसुंगी ग्रामपंचायतीचे सदस्य रणजीत रासकर सांगतातः “माझ्या रानातल्या भाज्यांमध्ये आता शिशाचं प्रमाण जास्त आहे. हे फार धोकादायक आहे आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.”






